
या तालुक्यात धुवाधार पावसाची बॅटिंग
वेगवान मराठी : मारुती जगधने
[दिनांक : २२ सप्टेंबर २०२५]
नांदगाव शहर व तालुक्यात सोमवार दि. २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. तब्बल ४० मिनिटे झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे.
या पावसामुळे शहरातील गटारे तुडुंब भरून वाहू लागली, तर काही ठिकाणी पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक विस्कळीत झाली. बाजारपेठा, मुख्य रस्ते आणि वस्ती भागात पाणीच पाणी दिसून आले.
हवामानात गारवा निर्माण झाला असला तरी पिकांसाठी हा पाऊस धोकादायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याआधीच झालेल्या पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचले आहे.
कृषी तज्ज्ञांच्या मते, कांदा पिकासाठी हा पाऊस लाभदायी असून वाढीस चालना मिळणार आहे. मात्र, गहू, हरभरा, ज्वारी यांसारख्या रब्बी पिकांना तर मका, बाजरी, कडधान्ये, तेलबिया, सोयाबीन आणि भाज्यांसारख्या खरीप पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
शेतकरी सांगतात की सततच्या पावसामुळे पिकांच्या मुळांजवळ पाणी साचून कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे. काही ठिकाणी पिके आडवी होण्याची स्थितीही दिसत आहे.
कृषी विभागाने शेतकऱ्यांना पाण्याचा निचरा करण्याची तातडीची उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. उशिरा पेरणी केलेल्या कांद्याच्या लागवडीस मात्र हा पाऊस फायद्याचा ठरणार आहे.
या पावसामुळे नदी-नाल्यांमध्ये पाणीपातळी वाढली असून प्रशासनाने नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. पूरपाण्यापासून सुरक्षित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



