महाराष्ट्र,देश

२५० कोटी रुपयांची विकासकामे रखडली

वेगवान नाशिक / बाबा पवार

देवळा : तालुक्यात पूर्ण झालेल्या कामांची सुमारे २०० कोटी रुपयांची बिले शासनाकडे थकीत असल्यामुळे कंत्राटदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. यामुळे नवीन मंजूर झालेली २५० कोटी रुपयांची विकासकामे रखडली असून, याचा थेट फटका तालुक्यातील नागरिकांना बसत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग कळवण आणि मालेगाव अंतर्गत देवळा तालुक्यात गेल्या काही वर्षांत रस्ते, पाणीपुरवठा योजना, शैक्षणिक इमारती आणि जलसंधारण यांसारखी अनेक विकासकामे पूर्ण झाली आहेत. ही कामे पूर्ण करूनही त्यांची बिले अनेक महिन्यांपासून थकीत आहेत. त्यामुळे कंत्राटदार मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.

ठेकेदारांनी व्यक्त केल्या अडचणी

कंत्राटदार संघटनेच्या प्रतिनिधींनी सांगितले की, ही कामे पूर्ण करण्यासाठी कंत्राटदारांनी स्वतःकडील भांडवल वापरले आहे. तसेच, त्यासाठी मोठ्या प्रमाणात कर्जही घेतले आहे. बिले वेळेवर न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार, बँकेचे हप्ते आणि बांधकाम साहित्याचे पैसे देणे कठीण झाले आहे.

या गंभीर परिस्थितीमुळे बांधकाम साहित्य पुरवठादारांनीही नवीन माल देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे कंत्राटदारांनी नवीन विकासकामे सुरू करण्यास नकार दिला आहे. याचा परिणाम म्हणून, तालुक्यातील रस्त्यांची दुरुस्ती थांबली असून, इतर मंजूर विकासकामेही रखडली आहेत. यामुळे नागरिकांची गैरसोय वाढत आहे.
प्रतिक्रिया : “आम्ही शासनाच्या विश्वासावर कामे हाती घेतली आणि वेळेत पूर्ण केली. मात्र, बिले मिळत नसल्याने आमच्यावर मोठे आर्थिक ओझे आले आहे. बांधकाम साहित्य पुरवठादारांनी उधारी देणे बंद केले असून, बँकांकडून कर्जासाठी दबाव वाढत आहे. त्यामुळे नवीन मंजूर झालेली कामे सुरू करण्यास आम्ही असमर्थ आहोत.” — महेंद्र पाटील (कंत्राटदार)

बाबा पवार

गेल्या १७ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. दैनिक देशदूत, लोकमत, आपलं महानगर, नवराष्ट्र, स्वतंत्र भारत आदी दैनिक, AM न्युज TV चॅनल, नाशिक सिटी न्युज आदी इलेक्ट्रॉनिक चॅनल, वेगवान न्यूज तालुका प्रतिनिधी म्हणून कामाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी, शैक्षणिक, शेती, यशोगाथा, आदी विषयावर विशेष लिखाणाची आवड.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!