बागलाणच्या शिरपेचात मानाचा मुकुट.. नैसर्गिक शेतीतील योगदानाबद्दल राष्ट्रीय अटल भुषण पुरस्कार

सटाणा दि.१६ सप्टेंबर २०२५ : – तालुक्यातील चौंधाणे येथील नैसर्गिक शेतीच्या पुरस्कर्त्या लक्ष्मीताई मधुकर मोरे यांची राष्ट्रीय स्तरावरील अटल भूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.येत्या शुक्रवारी(दि.(१९) दिल्ली येथील प्रधानमंत्री संग्रहालयात आयोजित सहाव्या राष्ट्रीय अटल अवार्ड समारोहात मोरे यांना गौरविण्यात येणार आहे.सौ.मोरे यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाची दखल घेत थेट राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाल्याने त्यांचे अभिनंदन होत आहे.
देशभरात सामाजिक,आर्थिक आणि तांत्रिक प्रभाव निर्माण करणाऱ्या भारतातील उत्कृष्ट नवोन्मेषक,उद्योजक आणि संस्थांचा अटल फाउंडेशनतर्फे हा राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो.माजी केंद्रीय मंत्री डॉ. सत्यनारायण जाटिया,फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्याम जाजू,१००८ महामंडलेश्वर राजेश ओझाजी,पार्लमेंटरी कमिटीचे अविनाशराय खन्ना,माजी केंद्रीय मंत्री संजीव बल्याण,आंतरराष्ट्रीय वैश्य फेडरेशनचे अशोक अग्रवाल,विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री बजरंगलाल बंगारा,फाउंडेशनच्या राष्ट्रीय अध्यक्ष अपर्णा सिंग आदी मान्यवरांच्या उपस्थितीत लक्ष्मीताई यांना राष्ट्रीय अटल भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.अटल फाउंडेशनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश राजे यांनी याबाबत मोरे यांना पुरस्कार निवडीबाबतचे पत्र दिले असून अटल फाउंडेशन परिवाराकडून मोरे यांना निमंत्रित करण्यात आले आहे.सौ.लक्ष्मीताई यांनी श्री श्री रविशंकर यांच्या प्रेरणेतून नैसर्गिक शेतीच्या क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.त्यांनी विषमुक्त मिश्र फळ शेती, भाजीपाला उत्पादन तसेच देशी बी बियाण्यांच्या वाणांचे पुनरुजीवन केले आहे. राज्य शासनाकडून नुकताच त्यांना राज्यस्तरावरील जिजामाता कृषीभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते.या क्षेत्रातून तालुक्यातून हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणाऱ्या सौ.मोरे या पहिल्याच महिला ठरल्या असून त्यांचे सर्वच क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.



