खेडलेझुंगे येथून संघर्ष योद्दा मनोज जरांगेपाटील यांनी दिला हा इशारा

वेगवान नाशिक /किरणकुमार आवारे
शिरवाडे वाकद दि.३ ऑगस्ट :- मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला लढा आता निर्णायक टप्प्यावर आला असून, यावेळी कुणीही अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, तर समाज त्यांना वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाही, असा ठाम इशारा मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
खेडलेझुंगे (ता. निफाड) येथे ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ८ वाजता पार पडलेल्या भव्य महामेळाव्यात ते बोलत होते. यावेळी परिसरातील निफाड, येवला आणि सिन्नर तालुक्यातून हजारो मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या भाषणात जरांगे पाटील म्हणाले, “जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत, तोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाला कुणीही धक्का लावू शकत नाही असे आरक्षण आपल्याला मिळवायचे आहे. आरक्षण ही आपली हक्काची गोष्ट आहे, आणि ती मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही.”
ते पुढे म्हणाले, “पूर्वी आरक्षण मिळणार नाही, असे सांगणारेच अनेक होते. पण आता प्रक्रिया अंतिम टप्प्यावर आली आहे. येत्या दि. २९ ऑगस्ट रोजी आपण निर्णायक लढा उभारणार आहोत. त्या दिवशी मुंबईकडे कूच करताना नाशिक आणि पुणे जिल्ह्यांवर मोठी जबाबदारी असणार आहे. कोणतीही माघार न घेता आपण संपूर्ण ताकदीने मैदानात उतरायचं आहे.”
या मेळाव्यात समाजाच्या एकजुटीचा निर्धार व्यक्त करत मराठा कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी प्रवीण कदम, प्रसाद फापाळे, अभिजित डुकरे, राजेश भडांगे, राहुल वाघ, धर्मराज घोटेकर, विजय गिते, गणेश गोरडे, अजय सदाफळ, अजिंक्य साबळे, अमोल मेमाणे, कल्पेश वायकर, भैय्या घोटेकर, अनिकेत साबळे, सागर भारस्कर, नारायण सदाफळ, ऋषी घोटेकर, अनिल सदाफळ, बाबा गोसावी, प्रदीप परदेशी, निलेश घोटेकर, सागर सदाफळ, शरद गिते, सुनील माळी, विठ्ठल बेर्डे आणि विष्णू मेमाणे यांनी संयोजनात सक्रिय सहभाग घेतला.



