देशातील आव्हानांचा सामना करण्यासाठी नागरिकांचे योगदान महत्त्वाचे – सुनील साठे

वेगवान नाशिक / बाबा पवार
देवळा : “देशासमोर असलेल्या विविध आव्हानांचा समर्थपणे सामना करण्यासाठी केवळ संघटनात्मक कार्य पुरेसे नाही, तर प्रत्येक सुजाण नागरिकाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. राष्ट्रकार्यासाठी सर्वांनी मतभेद विसरून एकत्र येणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य प्रज्ञाप्रवाहचे संयोजक सुनिलजी साठे यांनी केले.
मालेगाव येथे ३ मे रोजी आयोजित ‘संघशताब्दी मंथन’ या प्रमुख जनसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. वैचारिक क्षेत्रातील मान्यवरांसाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात आणि प्रास्ताविक
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि भारतमाता पूजनाने झाली. व्यासपीठावर पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे सुनिलजी साठे, राघवेंद्र देशपांडे आणि मालेगाव जिल्हा संघचालक अशोकजी कांकरिया उपस्थित होते. मालेगाव जिल्हा प्रचारप्रमुख पुंडलिक आहेर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर सहप्रचारप्रमुख प्रा. चरणसिंग राजपूत यांनी उपस्थितांना वक्त्यांचा परिचय करून दिला.
संघटनात्मक ताकद आणि स्वयंसेवकाची भूमिका
आपल्या मार्गदर्शनात सुनील साठे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कार्यपद्धती स्पष्ट करताना राष्ट्राचे महत्त्व, स्वयंसेवकांची भूमिका आणि संघटनेची ताकद यावर प्रकाश टाकला. देशाच्या प्रगतीसाठी नागरिकांनी सक्रिय होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. सत्राच्या उत्तरार्धात उपस्थितांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी प्रश्नोत्तराचा तास झाला.
पंच परिवर्तनावर भर
राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी ‘पंच परिवर्तनाचे’ महत्त्व विशद करताना राघवेंद्र देशपांडे यांनी पाच मुख्य पैलूंवर मार्गदर्शन केले:
- सामाजिक समरसता
- पर्यावरण रक्षण
- कुटुंब प्रबोधन
- स्व-बोध (स्वदेशीचा विचार)
- नागरी शिष्टाचार
या पाच विषयांवर समाजात प्रत्यक्ष कृती कशी करता येईल, याची विविध उदाहरणे त्यांनी दिली.
मान्यवरांची उपस्थिती
या जनसंवाद कार्यक्रमाला मालेगावमधील प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स, ग्रंथालय संचालक, पत्रकार, संपादक, लेखक आणि कवी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता शहर प्रचारप्रमुख सुमित संन्याशिव यांनी ‘कल्याण मंत्र’ म्हणून केली.



