पंतप्रधान पीक विमा योजना प्रिमियम दर जाहीर; रब्बी अर्जासाठी १५ डिसेंबर शेवटची मुदत

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे
शिरवाडे वाकद दिनांक १० डिसेंबर २०२५ : रब्बी हंगाम २०२५ – २६ साठी पंतप्रधान पीक विमा योजनेचे अर्ज सुरू झाले आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार रबी पिकांसाठी १.५ टक्के तर नगदी पिकांसाठी ५ टक्के प्रीमियम आकारला जाणार आहे. योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी दि.१५ डिसेंबर ही अंतिम मुदत जाहीर करण्यात आली आहे. राज्य शासनाने मान्यता दिलेल्या ॲग्रीस्टॅक फॉर्मर आयडी शिवाय कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही, अशी माहिती निफाड तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार यांनी दिली.
अर्जासाठी आधार लिंक मोबाईल क्रमांक, आधार कार्ड, ७/१२ उतारा, भाडेपट्टा असल्यास करारनामा किंवा संमतीपत्र, पेरणीची स्वयंघोषणा पत्र आणि बँक पासबुकची प्रत आवश्यक आहे. भारतीय कृषी विमा कंपनी लि. मार्फत नाशिक जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या या योजनेत गहू पिकासाठी ४४ हजार रुपये विमा संरक्षणावर ०.५० टक्के प्रीमियम दराने २२० रुपये, हरभरा पिकासाठी ३३ हजार रुपयांवर ०.२५ टक्के दराने ८२.५० रुपये, भुईमुंगसाठी ४०,६०० रुपयांवर ०.२५ टक्के दराने १०१.५० रुपये तर कांदा पिकासाठी ९० हजार रुपयांवर १ टक्के प्रीमियमदराने ९०० रुपये भरावे लागणार आहेत. पीक विम्याचे अर्ज तालुक्यातील कोणत्याही नजीकच्या सी.एस.सी.केंद्रात दिनांक १५ डिसेंबरपर्यंत करता येणार आहेत. विलंब टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन निफाड तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार यांनी केले आहे.



