नाशिक ग्रामीण

के.जी.एस.साखर कारखान्यामुळे निफाड तालुक्याच्या विकासाला चालना ; ऊस उत्पादकांनी के.जी.एस. साखर उद्योगाला ऊस घालावा; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचे आवाहन

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे

शिरवाडे वाकद, दि.६ जाने.२०२६ :- नाशिक जिल्ह्यातील साखर उद्योग सध्या अडचणीत असताना के.जी.एस. शुगर कारखान्याला ऊस पुरवठा करून तो सक्षम करणे गरजेचे असून, यामुळेच निफाड तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचा विकास साधता येईल, असे प्रतिपादन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.

निफाड तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील के.जी.एस. शुगर कारखान्याला राजू शेट्टी यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी कारखान्याचे चेअरमन संजय होळकर व संचालिका सोनिया होळकर यांनी त्यांचे स्वागत केले.

यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, सध्याच्या काळात साखर कारखाने चालवणे अत्यंत जिकिरीचे झाले आहे. उपपदार्थ निर्मितीशिवाय साखर कारखाने टिकू शकत नाहीत. नाशिक जिल्ह्यातील साखर उद्योगाची परिस्थिती चिंताजनक असून कादवा साखर कारखाना वगळता इतर कारखाने बंद आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस पुरवठा करून कारखान्यांना सक्षम केले पाहिजे. सर्व संबंधित घटकांनी साथ दिल्यासच या भागाचा सर्वांगीण विकास साधता येईल. पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करणे गरजेचे असल्याचे सांगत त्यांनी, के.जी.एस. शुगर कारखान्यामुळे निफाड तालुक्याच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. होळकर कुटुंबीयांनी हा कारखाना ताब्यात घेऊन सुरू केला तसेच मागील शेतकऱ्यांची थकीत देयके अदा केली, याबद्दल त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

यावेळी संचालिका सोनिया होळकर म्हणाल्या की, सहा वर्षे बंद असलेला हा साखर कारखाना आम्ही विकत घेऊन अडचणीतून बाहेर काढला आहे. कारखाना सुरू करण्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी, कर्मचारी आणि सर्व संबंधित घटकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले.
कार्यकारी संचालक आदित्य होळकर यांनीही परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी के.जी.एस. शुगर कारखान्याला ऊस पुरवठा करून सहकार्य करावे, असे आवाहन केले.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे, प्रभाकर रायते, सेवा निवृत्त डीवायएसपी चंद्रशेखर गावले, ज्ञानेश्वर खाडे, रवींद्र बोडके, सोमनाथ बांगर, नागेश कर्डक, जयराम सांगळे, वसंत सांगळे, सोमनाथ सांगळे, मोहन सांगळे, विठ्ठल घुगे, विजय बोडके, विश्वनाथ घुगे, शरद बोडके यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी, कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

किरणकुमार आवारे

किरणकुमार आवारे हे गेली ३० वर्षांपासून प्रिंट मीडियात काम करत आहेत. याकाळात त्यांनी दैनिक देशदूत, दैनिक लोकमत, दैनिक गांवकरी, दैनिक उलाढाल, दैनिक तरुण भारत, दैनिक सार्वमत, दैनिक आधुनिक केसरी, दैनिक लक्ष महाराष्ट्र, लोकनामा मध्ये काम केले आहे व करत आहेत. दैनिक लोकनामा मध्ये त्यांनी सलग १५० भाग गावगाडा हे सदर चालवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!