- या तालुक्यात आपत्ती व्यवस्थापनाची दमछाक
वेगवान मराठी : मारुती जगधने
नांदगाव तालुक्यातील आठ महसूल मंडळांपैकी केवळ तीन मंडळांत (वेहेळगाव, न्यायडोंगरी, जातेगाव)च अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. मात्र नांदगाव, मनमाड, बाणगाव, हिसवळ आणि भार्डी या पाच मंडळांबाबत अजूनही कोणताही निर्णय झालेला नसल्याने शेतकरी प्रतीक्षेत आहेत.
कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या आणि नियोजनाचा अभाव यामुळे पंचनाम्यांचे काम संथगतीने सुरू असून अनेक गावांत अद्याप सुरुवातही झालेली नाही, तर काही ठिकाणी कर्मचारी टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून होत आहेत. प्रशासन मात्र स्कायमेट पर्जन्यमापक यंत्रणेच्या नोंदींचा हवाला देत मर्यादा व्यक्त करीत आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात उर्वरित पाचही महसूल मंडळात तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली आहे. गंभीर परिस्थिती ओढवल्यास आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कोलमडून पडण्याची शक्यता असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले.
शेतकऱ्यांच्या तक्रारींचा विचार करून प्रशासनाने सरसकट पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.



