या तालुक्यातील उत्तर-पूर्व भागात खळगी तुडुंब भरल्या, शेतकरी व वन्यजीवांना दिलासा
या तालुक्यातील उत्तर-पूर्व भागात खळगी तुडुंब भरल्या, शेतकरी व वन्यजीवांना दिलासा

वेगवान मराठी/ एकनाथ भालेराव
येवला (दि. 24 ऑगस्ट 2025) –
तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागात गेल्या दोन दिवसांत झालेल्या चिंब पावसामुळे शेतात जीवंतपणा आला असून खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पावसामुळे सोयाबीन, मका, बाजरी, तूर, मूग यांसारख्या खरीप पिकांना आवश्यक ती ओल मिळाली आहे. कोमेजलेली पिके सुदृढ होऊ लागली असून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले आहे.
नैसर्गिक खळग्यांत पाणी साठले,,,,
रहाडी, खरवंडी, देवदरी, ममदापुर, कोळम खुर्द, कोळम बुर्दुक, रेंडाळे, सोमठाणा जोश या गावांतील नैसर्गिक खळगी तुडुंब भरल्या आहेत. खडकाळ भागात तयार झालेल्या या खोलगट पाणवठ्यांतले पाणी कुठल्याही नदी-नाल्यात मिसळत नाही, तर फक्त बाष्पीभवनानेच कमी होते.
हे पाणी रांगडे कांदे व लाल कांदे पिकासाठी उपयोगी ठरते. काही शेतकरी यातून पाणी उचल करतात, तर वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी हे डोह जीवनदायी ठरतात. साधारण फेब्रुवारी अखेरपर्यंत या खळग्यांमध्ये पाणी टिकते.
अनिश्चित पावसामुळे निर्माण झालेली भीती
यंदा पावसाची अनियमितता व खंडामुळे खरीप हंगाम धोक्यात येईल अशी भीती होती. मात्र तालुक्याच्या उत्तर-पूर्व पट्ट्यात झालेल्या दमदार पावसामुळे परिस्थिती सुधारली असून शेतकऱ्यांमध्ये आशावाद निर्माण झाला आहे.
“जिथे नाही पाटाचे पाणी, तिथे वरुणराजाचीच कृपा”,,,,,
“आमच्या भागात कोणत्याच पाटपाण्याची सोय नाही. आता पाऊस आला… खळगी भरल्या आहेत आणि ओढ्या-नाल्यातून पाणी खळखळून वाहू लागले आहे, त्यामुळं आनंद आहे. लाल कांद्याच्या रोपाचे थोडे नुकसान होत आहे, पण अजूनही नियमित पाऊस आला तर रब्बी हंगाम चांगला जाईल,”
– भागवतराव सोनवणे (संयोजक, जलहक्क संघर्ष समिती )
दमदार पावसाचा लाभ झालेली गावे,,,
रहाडी, खरवंडी, देवदरी, कोळम खुर्द, कोळम बुर्दुक, भारम, वाघाळे, आडसूरेगाव
या पाटपाण्याची कोणतीही सोय नसलेल्या गावांत समाधानकारक पाऊस पडल्याने ओढे-नाले वाहू लागले असून शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.



