नाशिक ग्रामीण
या ग्रामपंचायतीत विक्रमी कर वसुली; नागरिकांकडून मूलभूत सुविधांबाबत प्रश्नचिन्ह
Nandgaon news
या ग्रामपंचायतीत विक्रमी कर वसुली; नागरिकांकडून मूलभूत सुविधांबाबत प्रश्नचिन्ह
वेगवान मराठी : न्यायडोंगरी दि १ जानेवारी २०२६
महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामीण भागातील निवासी मालमत्तांवरील घरपट्टी, पाणीपट्टी व दिवाबत्ती करावर ५० टक्के सूट जाहीर केल्यानंतर न्यायडोंगरी ग्रामपंचायतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या सवलतीचा लाभ घेत नागरिकांनी ३१ डिसेंबर रोजी रात्री बारा वाजेपर्यंत कर भरणा करत एकूण ६४ लाख २३ हजार ४७२ रुपये इतकी विक्रमी थकीत कर वसुली केली आहे.
या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, शेवटच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत ग्रामपंचायत कार्यालयात करदात्यांच्या रांगा लागल्या होत्या. न्यायडोंगरी ग्रामपंचायतीच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिन्यात इतक्या मोठ्या प्रमाणात कर वसुली झाल्याची नोंद झाली आहे.
दरम्यान, थकीत व्यावसायिक गाळा भाडे व सफाई करावरही ५० टक्के सवलत दिली असती, तर वसुली आणखी वाढली असती. मात्र, शासन निर्णयात तशी तरतूद नसल्याने ही सवलत देता आली नाही, असे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
इतक्या मोठ्या प्रमाणात कर भरणा झाल्यानंतर आता नागरिकांकडून ग्रामपंचायतीकडे मूलभूत नागरी सुविधांबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पंधरा दिवसांतून एकदाच होणारा अनियमित व अशुद्ध पाणीपुरवठा, अनेक भागांत साफसफाईचा अभाव, दिवाबत्तीची समस्या, बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे, आरोग्य सुविधांची दयनीय अवस्था, उघडी गटारे तसेच काही गल्ल्या व रस्त्यांची झालेली दुरवस्था यामध्ये सुधारणा होणार का, असा सवाल करदाते करत आहेत.
दुसरीकडे, नांदगाव शहरालगतच्या ग्रामीण भागातील काही ग्रामपंचायतींमध्ये नियमित कर वसुली होत नसल्याने नागरिकांनी मागणी केल्यामुळे मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे केवळ कर वसुलीपुरते न थांबता, ग्रामपंचायतींनी नागरी सुविधा पुरवण्यातही तत्परता दाखवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
तसेच नियमित कर वसूलधारकांनी ग्रामपंचायतकडे कराचे सवलतीची मागणी केली असता याबाबत ग्रामपंचायत कडून सविस्तर कोणतेही उत्तर मिळाले नाही नागरिकांना घरपट्टी आणि पाणीपट्टी करा मध्ये पुरेशी सवलत नांदगाव ग्रामीण मधील ग्रामपंचायत कडून मिळत नसल्या चा प्रश्न नागरिकांनी केला .



