महाराष्ट्रात पुन्हा हिवाळ्यात पाऊस कोसळणार…हवामान विभाग

वेगवान नाशिक /किरणकुमार आवारे
शिरवाडे वाकद दि.२४ नोव्हेंबर २०२५ :- राज्यातील उत्तरेकडील शीत वाऱ्यांचा वेग मंदावल्याने कडाक्याची थंडी कमी झाली आहे. दरम्यान, पावसाला पोषक हवामान तयार झाल्याने अनेक भागांत आकाश ढगाळ झाले असून काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
रविवारी धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी १०.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर उर्वरित महाराष्ट्रात किमान तापमान १४ अंशांवर गेल्याने गारठा लक्षणीयरीत्या घटला आहे. दिवसा उन्हाचा चटका वाढल्याने उकाड्याची जाणीव होत असून अनेक ठिकाणी कमाल तापमान तिशीपार पोहोचले आहे. कोकणातील रत्नागिरी येथे रविवारी ३५.४ अंश सेल्सिअस पारा नोंदवला गेला.
दक्षिण महाराष्ट्रात पावसाला पोषक वातावरण कायम असून राज्यात ढगाळ परिस्थिती दिसत आहे. आज ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत ढगाळ आकाश, विजांसह हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. किमान तापमानात झालेल्या वाढीमुळे थंडीत आणखी घट होणार आहे.
हवामानातील या बदलाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर जाणवत असून सर्दी–खोकल्यासारखे त्रास वाढताना दिसत आहेत. पुढील काही दिवस वातावरण अशीच स्थितीत राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. ऐन हिवाळ्यात पावसास अनुकूल वातावरण निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.



