नाशिक ग्रामीण

कायद्याची अंमलबजावणी — भय नाही, विश्वास हवा!

Nandgaon News

कायद्याची अंमलबजावणी — भय नाही, विश्वास हवा!

वेगवान मराठी : मारुती जगधने
दि. १४ ऑक्टोबर २०२५

नाशिक जिल्हा “कायद्याचा बालेकिल्ला” म्हणून प्रसिद्ध आहे, पण काही काळापासून गुन्हेगारीचे डोके वर काढताना दिसत होते. पोलिसांवर जनतेचा विश्वास कायम राहावा, यासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी गरजेची आहे. याच ध्येयाने नाशिक ग्रामीण पोलिसांनी हाती घेतलेली ‘कायदा-यात रहा तर फायदा-यात रहा’ ही मोहीम नक्कीच कौतुकास्पद ठरते.

मालेगाव तालुक्यातील झोडगे नगर परिसरात तलवारीसह सराईत गुन्हेगाराला अटक करून पोलिसांनी दाखवून दिलं की, कायद्याच्या चौकटीबाहेर कुणालाही वागू देणार नाही. ही केवळ एक कारवाई नसून, गुन्हेगारांच्या मनात भीती निर्माण करणारा आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मनात विश्वास दृढ करणारा संदेश आहे.

अशा कारवायांमुळे पोलिस दलाचा धाक आणि दयाळूपणा – दोन्ही बाजू संतुलित राखणे गरजेचे ठरते. कायद्याचा वापर बदला घेण्यासाठी नव्हे, तर समाजातील शांतता आणि सुरक्षितता टिकवण्यासाठी व्हायला हवा.

सोशल मीडियावर द्वेषपूर्ण पोस्ट, खोट्या अफवा, आणि आक्षेपार्ह भाषेमुळे कायदा मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. ही काळाची गरज आहे. कारण डिजिटल माध्यमातून पसरवले जाणारे विष समाजात तणाव निर्माण करते. त्यामुळे अशी जबाबदारीची भूमिका ही लोकशाही टिकवण्याच्या दृष्टीने स्वागतार्ह आहे.

तथापि, यासोबत पोलिसांनी सामान्य नागरिकांच्या हक्कांचेही रक्षण केले पाहिजे. कायदा सर्वांसाठी समान आहे – मग तो सामान्य नागरिक असो वा प्रभावशाली व्यक्ती.

शेवटी, ग्रामीण पोलिसांनी घेतलेली ही मोहीम जर सातत्याने व पारदर्शकपणे राबवली, तर नाशिक जिल्हा पुन्हा एकदा “कायद्याचा बालेकिल्ला” या ओळखीला योग्य ठरेल .

मालेगाव : ‘कायदा-यात रहा तर फायदा-यात रहा’ — तलवारीसह सराईत गुन्हेगार अटक

नाशिक जिल्हा ‘कायद्याचा बालेकिल्ला’ म्हणून ओळखला जात असला तरी, गुन्हेगारांनीच आता हा नारा घोषवाक्याप्रमाणे घेतल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कायद्याच्या कठोर अंमलबजावणीमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून, खाकी वर्दीचा वचक पुन्हा वाढताना दिसत आहे.

नाशिक ग्रामीण पोलिसांनी “कायदा-यात रहा तर फायदा-यात रहा” या विशेष मोहिमेअंतर्गत मालेगाव तालुक्यातील झोडगे नगर परिसरात पहाटे २:५१ वाजता कारवाई केली.
या वेळी अंजय बाजू जाधव (वय २०, रा. झोडगे नगर, मालेगाव) या सराईत गुन्हेगाराला तलवारीसह पकडण्यात आले.

गुन्ह्याचे तपशील :

  • तारीख: १३ ऑक्टोबर २०२५
  • गुन्हा क्रमांक: ७४५/२०२५
  • कायद्याचे कलम: भा.दं.वि. कलम ३७(१)(३) व शस्त्र अधिनियम कलम ४/२५
  • गुन्ह्याचे स्वरूप: जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करून तलवार घेऊन दहशत निर्माण करणे

सदर संशयीत आरोपीवर पूर्वीही अनेक गुन्हे दाखल असून, त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यास १५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी (PCR) दिली .

पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक तेजबिर सिंह सिंधू यांच्या मार्गदर्शनाखाली PI प्रितम चौधरी, PSI दामोदर काळे, PSI तुषार भडाणे तसेच पोलीस हवालदार, नाईक व शिपाई यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.

नाशिक ग्रामीण पोलिसांनी इशारा दिला आहे की —

“सोशल मीडियावर द्वेषपूर्ण पोस्ट, रील किंवा आक्षेपार्ह भाषा वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल. कायद्याचा भंग करणाऱ्यांना थेट तुरुंगात पाठवले जाईल.

“कायद्याची चोख अंमलबजावणी” या ध्येयाने ग्रामीण पोलीस दलाने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की, नाशिक जिल्ह्यात गुन्हेगारांसाठी आता सुटका नाही – कायद्याचं राज्यच चालणार!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!