शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या :- रयत क्रांती चे सांगळे यांची मागणी
शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या :- रयत क्रांती चे सांगळे यांची मागणी

वेगवान मराठी/ एकनाथ भालेराव
येवला, दिनांक : १६ सप्टेंबर २०२५
राज्यात सध्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पीक मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यातील अनेक भाग पाण्याखाली गेले असून, उन्हाळी कांदा, लाल कांदा, कांदा रोप वाटिका यांसह अनेक पिकांचे संपूर्ण नुकसान होण्याची भीषण स्थिती निर्माण झाली आहे.
राज्यातील महसूल मंडळे तसेच विविध जिल्ह्यांवर अतिवृष्टीमुळे प्रचंड फटका बसला असून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदतीची गरज असल्याचे रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष वाल्मिकराव सांगळे यांनी नमूद केले आहे.
सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्र शासनाने ३० मे २०२५ च्या आदेशानुसार कोरडवाहू क्षेत्रासाठी प्रति हेक्टर फक्त ₹८,५०० आणि बागायती क्षेत्रासाठी ₹१७,००० इतकी नुकसानभरपाई जाहीर केली आहे.
परंतु ही रक्कम अत्यल्प असून शेतकऱ्यांना आर्थिक दृष्टिकोनातून उभे राहणे शक्य नाही, अशी व्यथा सांगितली आहे.
वाल्मिकराव सांगळे यांनी सांगितले की, पंजाबमध्ये आम आदमी पार्टीच्या भगवंत मान सरकारने प्रति हेक्टर पन्नास हजार रुपये नुकसानभरपाई जाहीर केली असून, महाराष्ट्रातही तातडीने याच प्रमाणे प्रति हेक्टर ₹५०,००० नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी संघटना करत आहे.
याशिवाय अमेरिकेतून येणाऱ्या कपाशीवर ११% आयात कर काढून टाकल्यामुळे आगामी ऑक्टोबर महिन्यात शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा सुमारे १५०० रुपये कमी दर मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक संकट अधिक वाढणार आहे.
वाल्मिकराव सांगळे यांनी इशारा दिला की,
“जर शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर आंदोलनाचा मार्ग अवलंबला जाईल.”



