गणेशोत्सवात जोरदार पावसाची शक्यता, ढगफुटीचाही धोका

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे
शिरवाडे वाकद दि.२८ ऑगस्ट २०२५ :- यंदा गणेशोत्सवाच्या आगमनाला महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे, अशी माहिती अंदाज नव्हे माहिती या राष्ट्रीय हवामान माहिती व हवामान अलर्ट सेवेचे प्रमुख तसेच आंतरराष्ट्रीय हवामान संशोधक व ढगफुटी तज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी दिली आहे. सप्टेंबर महिन्यात मान्सूनचा जोर वाढता राहणार असून, उत्तर भारतासह महाराष्ट्रात ढगफुटीं (फ्लॅशफ्लड) च्या घटनांचा धोका वाढला आहे असे ही त्यांनी सांगितले. यंदा मान्सूनचा पाऊस सरासरीच्या १२५ टक्क्यांपेक्षा जास्त होत ओल्या दुष्काळाच्या पाऊसाची शक्यता देखील प्रा किरणकुमार जोहरे यांनी व्यक्त केली आहे, विशेषतः कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात असे जास्त पर्जन्यमान होईल असे वैयक्तिक संशोधन निष्कर्ष प्रा किरणकुमार जोहरे यांना प्रायमरी डेटा व ऑब्झरवेशन यांचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड अॅनेलिससने मिळाले आहेत.
◆ गणेश मंडळांनो ही काळजी घ्या!
वातावरणातील अस्तिरतेमुळे व मान्सून पॅटर्न बदलामुळे पावसाचे स्वरूप अनिश्चित होत पाऊस लांबला आहे, त्यामुळे सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले. गणेशोत्सवाच्या मिरवणुका आणि मंडप उभारणी करताना विद्युत जोडणी करतांना पावसाचा विचार करीत अपघात होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
◆जनहितासाठी हे उपाय हवेत!
आपत्कालिन पूर परिस्थिती, जिवितहानी व वित्तहानी टाळण्यासाठी समन्वयाने हवामान माहिती घेत जलव्यवस्थापन गरजेचे आहे. महाराष्ट्रातील धरणांमधून नियंत्रित पाण्याचा तातडीने विसर्ग करून किमान २५ टक्के जागा निर्माण करणे आवश्यक आहे, असे प्रा. किरणकुमार जोहरे यांनी जनहितासाठी सुचवले आहे. बंगालच्या उपसागरात तसेच अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने पावसाचा जोर वाढणार आहे. यामुळे कोयना, वारणा आणि लेंडीसारख्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची पातळी झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. प्रा. जोहरे यांनी कृषणाखोऱ्यासह इतर नदीकाठच्या भागातील नागरिकांना पाणीपातळीतील बदलांबद्दल सतर्क राहण्याचा, सोशल मिडीयावर खोट्या अफवा तसेच घबराट न पसरविण्याचा आणि प्रशासनाला सहकार्य करीत प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे.
◆भारताला हवेत ४०० एक्स बॅंड डॉप्लर रडार्स
भारतात सध्या ३७ डॉप्लर हवामान रडार कार्यरत आहेत. २०२५ पर्यंत ६२ रडार कार्यरत करण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. मात्र ढगांचा जणू एक्स रे काढत इंतभूत माहिती घेणाऱ्या अशा स्वदेशी बनावटीच्या ४०० एक्स बॅंड डॉप्लर रडार नेटवर्कची आवश्यकता आहे. हे नेटवर्क २४ बाय ७ बाय ३६५ दिवस हिमालयातील रांगांसह देशभर कार्यरत राहल असे भारत सरकारच्या अखत्यारीतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपीकल मेटियोओरॉलॉजी (आयआयटीएम), पुणेचे माजी हवामान संशोधक प्रा. किरणकुमार जोहरे यांनी सांगितले. यामुळे एआय, आयओटी, पीएलसी, स्काडा, ब्लॉकचेन आदी एडव्हान्सड इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजीचा वापर करीत नागरिकांना मोबाईलवर रियल टाईम व कस्टमाइज हवामान माहिती व अलर्ट देता येणे शक्य होईल तसेच अन्नसुरक्षा व राष्ट्रीय अर्थव्यवस्था बळकट करणे शक्य होईल असे ही प्रा किरणकुमार जोहरे म्हणाले.



