
मानव–वन्यजीव सहजीवनाची गरज !
दरवर्षी साजरा होणारा वन्यजीव सप्ताह म्हणजे केवळ कार्यक्रमापुरता औपचारिक उत्सव नाही, तर तो आपल्याला निसर्गाशी असलेल्या नात्याची आठवण करून देतो. नांदगाव तालुक्यातील चांदोरे येथे नुकताच झालेला उपक्रम हे याचे ज्वलंत उदाहरण आहे. विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच बिबट्या, साप, तरस, लांडगा, निलगाय, हरीण अशा प्राण्यांची माहिती करून देणे, त्यांच्या सहजीवनाच्या पद्धती सांगणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
आज ग्रामीण भागात बिबट्या आणि मानव संघर्षाची समस्या गंभीर होत चालली आहे. शेतकरी बांधवांना आपली जनावरे वाचवावी लागतात, तर दुसरीकडे निसर्गात आपले अस्तित्व टिकवण्यासाठी बिबट्यालाही तितकेच संघर्ष करावे लागतात. यातून उद्भवणारे संघर्ष टाळण्यासाठी जनजागृती हाच एक प्रभावी मार्ग आहे. चांदोरे शाळेत झालेल्या कार्यक्रमात याच मुद्द्याला थेट स्पर्श करण्यात आला.
याचप्रमाणे शून्य सर्पदंश अभियान हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. विषारी व बिनविषारी सापांची माहिती मिळाल्यास भीतीपेक्षा जागरूकता वाढते आणि अनावश्यक जीवितहानी टाळता येते. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीव संवर्धनाची बीजे रुजतात.
वनविभाग, स्थानिक सर्पमित्र आणि सामाजिक संस्थांचे एकत्रित प्रयत्न प्रशंसनीय आहेत. परंतु अशा कार्यक्रमांची व्याप्ती फक्त शाळांपुरती न राहता संपूर्ण गावोगावी व्हावी, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी, ही खरी गरज आहे.
आजच्या पिढीला शिकवताना आपण त्यांना फक्त प्राणी वाचवा एवढंच सांगून थांबायचं नाही, तर त्यांना हे पटवून द्यायचं आहे की निसर्ग वाचवणे म्हणजे आपले भविष्य वाचवणे होय.
निसर्गाशी संघर्ष नव्हे तर सहजीवन हाच पर्याय आहे – आणि याच विचाराने वन्यजीव सप्ताहाचे उपक्रम अधिक व्यापक व्हायला हवेत.
माहिती वन्यजीव संरक्षण संस्था शाखा नांदगाव तालुका :-अध्यक्ष सर्पमित्र प्रभाकर निकुंभ आणि मंगेश आहेर. तालुक्यातील विविध भागात आढळून येणारे वन्यप्राणी..तरस, कोल्हा, लांडगा, उदमांजर, साप, बिबट्या निलगाय व इतर प्राण्यांची मार्गदर्शन उल्लेखनिय होते प्रसंगी कार्यक्रमात आर बी शिंदे वनरक्षक परधडी. एस आर सोनवणे वनरक्षक न्यायडोंगरी.. व्ही बी बलसाने. आर के महाजन..
जिल्हा परिषद शाळा चांदोरे मुख्याध्यापक राजाराम यशवंत निकम
साहेबराव तुकाराम वाडीले, निंबाजी संपत चव्हाण, नेहमीचंद बाबू चव्हाण, विजय बळीराम जाधव, निहाल चागोराव बिसेन. यांनी योगदान दिले .



