- या गावच्या शिवार रस्त्यांची दयनीय अवस्था – शेतकरी व विद्यार्थ्यांची होरपळ
वेगवान मराठी : मारुती जगधने
नांदगाव दि . 23 ऑगस्ट 2025
जातेगाव शिवारातील रस्त्यांची अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, हे रस्ते पूर्णपणे चिखलाने माखलेले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाणे कठीण झाले असून, पिकांची वाहतूक व शेतीसाठी लागणाऱ्या ट्रॅक्टर-गाड्यांना सतत अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दररोज शिवार रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास उशीर होतो. प्रवासी वाहतूक साधने देखील या मार्गावरून नीटपणे धावू शकत नाहीत. परिणामी गावकऱ्यांना दैनंदिन जीवनात मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
स्थानिक शेतकरी सांगतात की, पावसाळा सुरू होताच रस्त्याची अवस्था अधिक बिकट बनते. पायपीट करतानाही पाय चिखलात रुततात, तर दुचाकीस्वारांना अपघाताचा धोका सतत जाणवतो. अनेक वेळा रुग्णवाहिका किंवा इतर आपत्कालीन सेवा रस्त्यामुळे अडकून बसल्याची उदाहरणे आहेत.
ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही आजतागायत रस्त्यांची दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे लोकांमध्ये प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त होत असून, तात्काळ शिवार रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
जातेगाव परिसरातील शेतकरी व नागरिकांचे म्हणणे आहे की, जर वेळेत उपाययोजना न झाल्यास पिकांच्या हंगामी वाहतुकीसह विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि नागरिकांच्या आरोग्यसेवेवर परिणाम होणार आहे.
निर्भय महाराष्ट्र पार्टी च्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या सोबत जाऊन शिवार रस्त्याने चालून दाखवत रस्त्याची खरी परिस्थिती काय आहे .
रस्त्यात किती मोठे खड्डे पडलेत किती चिखलातून चालावं लागतं एक पाय फसला तर दुसरा पाय काढणं मुश्किल झालंय तेव्हा या शिवार रस्त्याने जाणारी इतर वाहने आणि पादचारी विद्यार्थी शेती वाहतुकीची वाहने कसे जातील या संदर्भात रस्ता मजबुती करण्याची मागणी येथील शेतकरी आणि निर्भय महाराष्ट्र पार्टीचे वतीने करण्यात आले आहे
दरम्यान यापूर्वी याच शिवार रस्त्यासाठी शिवार रस्त्याच्या लगत असलेल्या शेतकऱ्यांनी लाखो रुपये वर्गणी एकत्रित करून स्वखर्चाने या पांदी रस्त्याचे दुरुस्ती करण केले होते त्याला बरेच दिवस झाले त्यानंतर हा रस्ता मजबुतीकरण होईल असे अपेक्षा शिवार रस्त्यावरील शेतकऱ्यांना होती परंतु या रस्त्या चे अद्याप मजबुतीकरण न झाल्यामुळे रस्ता पूर्णपणे चिखलाने माखला गेलेला आहे तेव्हा शेतकऱ्यांनी शेतात जावे कसे यावे कसे आणि शेतातून मुख्य गावात येण्यासाठी किती अडचणींचा सामना करावा लागतो यासंदर्भात शेतकऱ्यांनी चिखल रस्त्यावरती फेरफटका मारून पांधी रस्त्याची दयनी अवस्था कशी झाली आहे याचे चित्रीकरण केलेले आहे.



