सरसकट कर्जमाफी करून,ओला दुष्काळ जाहीर करा.. विनोद पाटील
सरसकट कर्जमाफी करून,ओला दुष्काळ जाहीर करा.. विनोद पाटील

वेगवान मराठी/ एकनाथ भालेराव
येवला: दिनांक :28 सप्टेंबर /येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागातील अनेक गावे मुसळधार पावसामुळे बाधित झाली आहे. नगरसुल गाव व पंचक्रोशीतील गावांमध्ये देखील सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घरांची पडझड झाली असून, व्यावसायिकांचे ही नुकसान झाले आहेच पण हाता-तोंडाशी आलेले मका, बाजरी, सोयाबीन, भुईमूग, कांदा, कांदा रोपे आदी पिकांबरोबर नुकतीच लागवड केलेले परंतु पाण्यात गेलेल्या पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे… त्यात जनावरांचे ही नुकसान…
आज मितीला पार उध्वस्त होण्याच्या मार्गावर शेतकरी येऊन ठेपला आहे… नव्हे तर तो उध्वस्तच झाला आहे असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही..
प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन, पंचनामे करण्याचे आदेश द्यावे किंबहुना सरसकट जेणेकरून आधीच सुलतानी संकटाला तोंड देत असलेल्या बळीराजाला या अस्मानी संकटाच्या काळात दिलासा देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची आज तरी खऱ्या अर्थाने गरज निर्माण झाली आहे…
आता खऱ्या अर्थानं मायबाप सरकारने सरसकट कर्जमाफी करून ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना मदत करावी तसेच ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत भाग घेतला आहे त्यांना मदतीसाठी संबधीत कंपन्या यांना योग्य त्या सूचना देण्यात याव्यात अशी मागणी युवा सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील यांनी केले आहे



