
तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करा
वेगवान मराठी : मारुती जगधने
[नांदगांवः दि 25 सप्टेंबर 2025 ] नांदगाव जिल्हा नाशिक येथील अतिवृष्टी मधील आठ मंडळांपैकी तीन मंडळांना अतिवृष्टीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले असून त्या संदर्भातल्या सूचना तहसीलदार सुनील सैंदाणे यांनी मौखिक आदेश पारित केले आहे .नांदगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तब्बल 101 गावांमध्ये पावसाचा तडाखा बसून शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली आहेत. नदी-नाले वाहत असल्याने खरीप हंगामाचे भविष्य अंधारात गेले आहे.
यामध्ये शासनाने केवळ तीन महसूल मंडळांचा — वेहळगाव, जातेगाव आणि न्यायडोंगरी — प्राथमिक टप्प्यात समावेश केला असला, तरी प्रत्यक्षात संपूर्ण तालुका अतिवृष्टीच्या झळा सोसत आहे. या पार्श्वभूमीवर पंचनामे करण्याचे आदेश दिले गेले असले, तरी मदत किती तातडीने आणि किती न्याय्य पद्धतीने पोहोचेल, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.
कागदोपत्री आदेश आणि पंचनाम्यांची प्रक्रिया सुरू आहे; मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात ठोस मदत पोहोचावी, हीच खरी वेळेची गरज आहे. प्रशासनाच्या हालचाली जलद गतीने होणे अपेक्षित आहे, कारण प्रत्येक दिवसागणिक शेतकरी आर्थिक, मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या खचत चाललेला आहे.
शासनाने आता फक्त तीन मंडळांपुरते न राहता संपूर्ण तालुक्याच्या नुकसानीकडे लक्ष देणे अत्यावश्यक आहे. कारण शेतकरी हा राष्ट्राचा कणा आहे. त्याची पिके वाचवली नाहीत, तर उद्याचा अन्नसुरक्षेचा प्रश्न गंभीर होईल.
शेतकऱ्यांना दिलासा देणे आणि तातडीने आर्थिक मदत पोहोचवणे हीच सध्याची खरी प्रशासनाची कसोटी आहे.
प्रतिक्रिया :
सतत पडणाऱ्या पावसामुळे तसेच ६५ मी.मी. पाऊस पडलेल्या गावाना ग्राम महसूल अधिकारी,ग्राम विकास अधिकारी,ग्राम कृषी अधिकारी यांनी तातडीने भेटी देऊन ज्या ठिकाणी नुकसान झाले आहे तेथे पंचनामे करून अहवाल सादर करावेत
: सुनिल सैंदाणे तहसिलदार नांदगांव



