घाटात अपघातामुळे २० तास वाहतूक ठप्प; रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिक संतप्त
Nandgaon news
घाटात अपघातामुळे २० तास वाहतूक ठप्प; रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिक संतप्त
वेगवान मराठी : मारुती जगधने
दि 23 फेब्रुवारी 2026
नांदगांव :
: चांदेश्वरी (अवघड वाहनांचा घाट) घाटात रविवारी रात्री झालेल्या एका भीषण अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक तब्बल २० तास विस्कळीत झाली होती. ब्रेक निकामी झालेल्या एका ट्रकने दुसऱ्या ट्रकला धडक दिल्याने हा अपघात घडला, ज्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
अपघाताचा थरार
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री २ वाजेच्या सुमारास कन्नड तालुक्यातील चापानेर येथील कापूस व्यापाऱ्याचा कापूस घेऊन गुजरातला जाणारा आयशर ट्रक (MH-20-GC-7329) चांदेश्वरी घाट उतरत होता. याच वेळी पाठीमागून येणाऱ्या, मक्याचे पोते भरलेल्या १२ टायरच्या अवजड ट्रकचे ब्रेक निकामी झाले.
नियंत्रण सुटलेल्या या ट्रकने आयशर ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेमुळे आयशर ट्रक घाटातील रस्त्यावर आडवा झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
२० तास वाहतुकीचा खोळंबा
या अपघातामुळे घाटातील रस्ता पूर्णपणे बंद झाला होता. रात्री १ वाजेपासून सुरू झालेली ही कोंडी दुसऱ्या दिवशी सायंकाळी ८ वाजेपर्यंत कायम होती. सुमारे २० तास हा मार्ग बंद राहिल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अखेर वाहतूक परधाडी मार्गे दुसऱ्या घाटातून वळवण्यात आली होती.
रस्त्याची झालीय ‘चाळण’
नांदगाव होऊन कासारी बोलणण जाणारा रस्ता बोल ठाण घाटातील रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या मार्गावरून दररोज खालील वाहनांची मोठी वर्दळ असते:
- खाजगी प्रवासी बस आणि एसटी महामंडळाच्या बसेस.
- तापीची वाळू वाहून नेणारे हायवा ट्रक.
- दक्षिण-उत्तर भारताला जोडणारी मालवाहतूक करणारी अवजड वाहने.
- बोलठाण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमुळे शेतमाल वाहून नेणारे ट्रॅक्टर व छोटा हत्ती.
नांदगांव चाळीसगाव फाटा ते मन्याड फाटा या दरम्यानच्या ५० किलोमीटर रस्त्याची पूर्णतः चाळण झाली असून, खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका सुरूच आहे.
प्रशासनाचा दुर्लक्ष असल्याचा आरोप
स्थानिक ग्रामपंचायतींनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित प्रशासनाला यापूर्वी अनेकदा निवेदने दिली आहेत. दोन महिन्यांपूर्वी या रस्त्याची डागडुजी करण्यात आली होती, परंतु अवघ्या ४-५ दिवसांतच हा रस्ता पुन्हा खराब झाला. दर्जाहीन कामामुळे आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे शासन प्रशासन यां मार्गावर अपघातात कुणाच्या मरणाची वाट बघत आहे का ? असा सवाल वाहन धारक करतात . रस्ता खराब असल्याने होणारे अपघाताल शासनास जबाबदार धरावे असा प्रश्न केला जातो . .



