
नाफेड–एनसीसीएफच्या कांदा विक्री धोरणामुळे व्यापारी व शेतकरी अडचणीत
वेगवान मराठी : मारुती जगधने
[दिनांक : 25 सप्टेंबर 2025 ]
नाशिक जिल्ह्यात नाफेड व एनसीसीएफमार्फत खरेदी करण्यात आलेला कांदा ग्राहकांना थेट विक्री न करता देशातील कोलकाता, पटना, सिलीगुडी, चेन्नई, चंदीगड, लखनऊ, मदुराई, गुवाहटी अशा मोठ्या घाऊक बाजारपेठेत रेल्वे रॅकद्वारे पाठविला जात आहे. परिणामी स्थानिक व्यापारी व शेतकरी मोठ्या अडचणीत आले आहेत.
पूर्वी मर्यादित प्रमाणात ट्रक लोडिंगद्वारे कांद्याची विक्री केली जात होती; मात्र आता एकावेळी २२ ते २५ बोग्यांचा रॅक बाहेरगावी पोहोचवल्याने बाजारात अतिरिक्त पुरवठा होत आहे. नाफेडचा कांदा कमी दरात उपलब्ध झाल्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांचा कांदा विक्रीत स्पर्धा निर्माण होत आहे आणि त्यांना तोटा सहन करावा लागत आहे.
या परिस्थितीचा थेट परिणाम बाजारभावांवर होत असून शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळत नाही. त्यामुळे व्यापारी व शेतकरी या दोन्ही घटकांना मोठा फटका बसत आहे.
स्थानिक शेतकरी व व्यापाऱ्यांनी मागणी केली आहे की, नाफेडचा कांदा घाऊक बाजारात न विकता थेट किरकोळ ग्राहकांपर्यंत किंवा स्वस्त धान्य दुकानांमार्फत पोहोचवावा. तसेच पारदर्शक व संतुलित धोरण राबवून बाजारातील स्वाभाविक भाव टिकवावेत.



