नाशिक ग्रामीण
देवळा येथे टपरीधारकांचे लाक्षणिक उपोषण; प्रशासनाकडून मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन

वेगवान नाशिक / बाबा पवार
देवळा : विंचूर-प्रकाशा राष्ट्रीय महामार्गाच्या देवळा शहरातून जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या टपरीधारकांनी न्याय मिळावा यासाठी शुक्रवार, दि. १ रोजी कुटुंबासह लाक्षणिक उपोषण केले. या उपोषणाची दखल घेत मंडल अधिकारी सुवर्णा थेटे, पोलिस निरीक्षक सार्थक नेहेते आणि नगरपंचायत मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर यांनी उपोषणस्थळी भेट देऊन टपरीधारकांचे निवेदन स्वीकारले. त्यांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.
मागण्या मान्य न झाल्यास, येत्या १५ ऑगस्ट रोजी टपरीधारक कुटुंबासह पाच कंदील येथे सकाळी सहा वाजेपासून अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचा इशाराही या वेळी देण्यात आला आहे.
यावेळी आबासाहेब खैरनार, गणेश निकम, योगेश वाघमारे, काशीनाथ आहिरे, राजेंद्र कानडे, रविंद्र वाळुंज, संजय गांगुर्डे, गोकुळ देवरे, बाळासाहेब शिरसाट, सुभाष शिरसाठ, विलास शिरवाडकर, भूषण खरोटे, जयराम कोठावदे, रवींद्र सोनवणे, कांतीलाल देशमुख, आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
लाक्षणिक उपोषणाच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत:
- देवळा शहरातून जाणार्या रस्त्याची रुंदी कमी करून तो आहे त्याच परिस्थितीत तयार करण्यात यावा.
- पाचकंदील ते देवळा महाविद्यालयापर्यंत या रस्त्याची लांबी ३०० ते ४०० मीटर असल्याने, त्याची रुंदी कमी केल्यास वाहतुकीस फारशी अडचण येणार नाही, या गोष्टीचा विचार करावा ही आग्रहाची मागणी आहे.
- राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, देवळा नगरपंचायतीचे प्रतिनिधी, शहरातील प्रतिष्ठित नागरिक, राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि छोटे व्यावसायिक यांची एकत्रित बैठक घेऊन यावर सुवर्णमध्य काढण्यात यावा.
- पूर्वीच्या राज्य महामार्गाची लांबी व रुंदी मोजमापाचा गोषवारा घेऊन, मध्यबिंदूपासून समांतर मोजणी करून रस्त्याची निर्मिती करण्यात यावी.
Tags
Deola


