वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे
शिरवाडे वाकद, दि. १५ ऑगस्ट २०२५ :- वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या भरवस फाटा येथे जलद गाड्यांना थांबा द्यावा, अशी मागणी निफाड पूर्व भागातील नागरिकांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांच्याकडे केली होती. यावर भुजबळ यांनी परिवहन महामंडळाशी पत्रव्यवहार केला. महामंडळानेही मागणी मान्य झाल्याचे कळवत अधिकृत पत्र मंत्री भुजबळ यांना पाठवले. हे पत्र व्हायरल होताच परिसरात जल्लोष झाला.
या निर्णयामुळे कोळपेवाडी, शिर्डी, नांदगाव, वाकद, वाहेगाव, गोळेगाव, शिरवाडे, गोंदेगाव आदी गावांतील शेकडो प्रवाशांना दिलासा मिळणार होता. कारण स्थानिक बससेवा मर्यादित असल्याने लांब पल्ल्याच्या बसेस हा भागासाठी अत्यावश्यक पर्याय होता. मात्र भरवस फाट्यावर बस न थांबल्याने प्रवाशांना येवला किंवा विंचूर येथे उतरून परतीसाठी स्थानिक वाहनांचा आधार घ्यावा लागत होता, त्यामुळे वेळ, पैसा आणि मानसिक त्रास वाढत होता.
या मागणीसाठी डॉ. श्रीकांत आवारे, भाऊसाहेब बोचरे, विनोद जोशी, शिवाजी सुपनर, माधव जगताप, शांताराम कांगणे, राजेंद्र कांबळे, रज्जाक पठाण, रत्नाकर शिरसाठ, मनोहर बोचरे, धनंजय जोशी, सुशील कांबळे, निखिल चव्हाण, दिलीप चव्हाण, भैय्या नरसिंगे, विलास शिरसाठ, ऋषिकेश जोशी आदींनी भुजबळ यांना निवेदन दिले होते. त्यांच्या पाठपुराव्यानंतर संभाजीनगर विभागातील नाशिक-१, नाशिक-२, मालेगाव, मनमाड, सटाणा, सिन्नर, नांदगाव, इगतपुरी, लासलगाव, कळवण, पेठ, येवला, पिंपळगाव आगराच्या सर्व बसेसना भरवस फाटा येथे अधिकृत थांबा देण्याचा निर्णय झाला. परंतु, पत्र जारी होऊन महिना उलटला तरीही जलद गाड्यांचा थांबा प्रत्यक्षात मिळालेला नाही. प्रवाशांची गैरसोय कायम असून, यामुळे महामंडळाने एकप्रकारे मंत्री भुजबळ यांची आणि नागरिकांची फसवणूकच केल्याचा आरोप होत आहे.