वारकरी संप्रदाय म्हणजे सामाजिक समतेचे अधिष्ठान :- हभप उषाताई साप्ते
वारकरी संप्रदाय म्हणजे सामाजिक समतेचे अधिष्ठान :- हभप उषाताई साप्ते

वेगवान नाशिक एकनाथ भालेराव
येवला दिनांक 23 जुलै 2025
“मोट, नाडा, विहीर, दोरी – अवघी व्यापिली ‘पंढरी’” म्हणणारे कर्मप्रधान संत सावता महाराज म्हणजेच दैनंदिन व्यवहारात विठोबाशी एकरूप होणारे अद्वितीय संत होते.
संत सावता महाराज हे कर्मप्रधान संत होते. शेतीच्या व्यवहारातून त्यांनी ईश्वराशी पूर्ण एकरूपता साधली. ‘कर्म हीच पूजा’ ही त्यांची भावना होती.”
येवला तालुक्यातील सायगाव दत्तवाडी येथे संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कीर्तनात हभप उषाताई महाराज यांनी उपस्थित भाविकांना संत सावता महाराजांच्या जीवनकार्याचा भावस्पर्शी परिचय करून दिला.
कर्मप्रधान भक्तीचा आदर्श
उषाताई म्हणाल्या, “
दैनंदिन व्यवहारात देवत्व पहाणे ही अत्युच्च भक्तीची अवस्था आहे – आणि ती सावता महाराजांनी सामान्य माणसांसाठी सुलभ केली.
🔹 भक्तीचा सुवर्ण काळ – तेरावे शतक
“ज्ञान, भक्ती आणि कर्म यांचा सुरेख संगम असलेला काळ म्हणजे तेरावे शतक. त्या काळात जातीय भेद नव्हते, हे ज्ञानेश्वर, नामदेव, चोखोबा, गोरा कुंभार यांच्या अभंगातून दिसते. हीच परंपरा संत सावता महाराजांनी पुढे चालवली आणि नंतर संत तुकाराम महाराजांनी १७व्या शतकात त्याचे सशक्त रूप दिले,” असे त्या म्हणाल्या.
🔹 वारकरी संप्रदाय: सामाजिक समतेचे अधिष्ठान
वारकरी संप्रदायाने महाराष्ट्राला सामाजिक समतेचा मूलमंत्र दिला असून, संत सावता महाराज हे त्याचे एक जिवंत उदाहरण आहेत. “सावता महाराजांनी कोणतीही अंधश्रद्धा, कर्मठता, बाह्य औडुंबर बर न स्वीकारता, साधेपणातून भक्तीचा मार्ग दाखवला.
🔹 नामदेवांचा अभंग आणि त्याचे भावनिक निरूपण
“धन्य ते अरण रत्नाची खाण, जन्मला निधान सांवता तो” या संत नामदेव महाराजांच्या अभंगावर हभप उषाताईंनी विशेष भावार्थ केला. त्या म्हणाल्या,
“सांवता म्हणजे प्रेमाचा सागर, साधेपणाचा मूर्तिमंत आदर्श.
‘न लगे सायास, न पडे संकट, नामे सोपी वाट वैकुंठाची’ – हा त्यांचा स्वत:चा अनुभव होता. त्यांनी स्वतः अनुभवलेलं ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवलं.”
🔹 सावता महाराजांचे जीवनकार्य:
संत सावता महाराजांना केवळ ४५ वर्षांचे आयुष्य लाभले.
त्यांनी कर्म आणि भक्तीचा संगम घडवून सामान्य जनतेला आत्मोन्नतीचा मार्ग दाखवला.
त्यांच्या साध्या जीवनातून उगम पावलेली भक्ती, आजही लोकांच्या हृदयात स्थान मिळवते.
“संत हे समाजाचे प्रतिबिंब आहेत, पण सावता महाराज हे समाजासाठी आरसा होते,” अशा शब्दांत हभप उषाताईंनी कीर्तनाचा समारोप केला. कार्यक्रमाला परिसरातील भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी गुरुदत्त मित्र मंडळाचे विशेष सहकार्य लाभले



