अंबासन फाट्याजवळ कांद्याचा ट्रक उलटला; दोघेजण गंभीर जखमी रस्त्यावरील खराब स्थिती आणि सूचना फलकांचा अभाव ठरतोय अपघातांचे कारण

अंबासन फाट्याजवळ कांद्याचा ट्रक उलटला; दोघेजण गंभीर जखमी
रस्त्यावरील खराब स्थिती आणि सूचना फलकांचा अभाव ठरतोय अपघातांचे कारण
वेगवान नाशिक/तुषार रौंदळ
विरगांव दि.१८ऑगस्ट२०२५ :- बागलाण तालुक्यातील अंबासन फाट्याजवळील पुलालगत रविवारी (ता. १७) रात्री नऊ वाजेच्या सुमारास अपघात घडला असुन कांद्याने भरलेला ट्रक (MH 18, BG 8693) नामपूरहून बैंग्लोरकडे निघाला होता, ट्रक उलटून चालकासह एकजण गंभीर जखमी झाला आहे.काकडगाव ते वडनेर खाकुर्डी रस्त्यावर अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेतांना दिसत नाही. आतापर्यंत अनेक अपघात घडले आहेत.
रविवारी रात्री नऊ वाजता झालेल्या अपघातात कौतिक रमेश भिसे (रा. दहेगाव मनमाड, ता. नांदगाव) आणि रोहन अशोक सुर्यवंशी (रा. लासलगाव) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक शेतकरी व अंबासनचे माजी उपसरपंच दिनेश कोर यांनी तत्काळ मदतीस धाव घेतली. त्यांनी शेतकऱ्यांच्या मदतीने जखमींना बाहेर काढून तातडीने रुग्णवाहिकेतून मालेगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांच्या माहितीनुसार सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. अपघाताचे मुख्य कारण म्हणून रस्त्याची खराब स्थिती आणि पुलाजवळ योग्य संकेत फलकांचा अभाव याकडे लक्ष वेधले जात आहे. सद्यस्थितीत काकडगाव ते वडनेर खाकुर्डी या रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र संबंधित ठेकेदाराने अपूर्ण कामावर कोणतीही सूचना, सतर्कतेचे फलक न लावल्याने वाहनचालकांना अपघाताच्या धोका लक्षात येत नाही.
स्थानिक वाहनचालक आणि रहिवाशांनी वारंवार प्रशासनाचे लक्ष वेधले असतानाही कुठलेही ठोस उपाय केले जात नाहीत, हेही स्पष्ट होत आहे. त्यामुळे अशा घटनांमुळे मानवी हानी होण्याची शक्यता वाढत आहे. या अपघातामुळे काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. ट्रक उलटल्यामुळे कांदा गोणी विखुरले गेले आणि मोठ्या प्रमाणावर ट्रकचेही नुकसान झाले आहे.



