
वेगवान मराठी/ एकनाथ भालेराव
येवला दिनांक 16सप्टेंबर 2025
सध्या देशभरातील मान्सून चक्रवातात विशेष हालचाली पाहायला मिळत आहेत. यंदा २४ मे रोजी केरळ आणि कर्नाटकमध्ये मान्सूनचे आगमन झाले. त्यानंतर महाराष्ट्रात प्रवेश करून अनेक दिवस राज्यभर पाऊस झाला. मात्र सध्या मान्सूनने राजस्थानच्या वाळवंटी भागातील श्रीगंगानगर, बिकानेर, नागौर, फालुदी, जैसलमेर, जोधपूर व बारमेर जिल्ह्यांतून माघारीचा प्रवास सुरू केला आहे.
हवामान अभ्यासकांच्या अंदाजानुसार, या वर्षी परतीचा पाऊस काही दिवस आधीच महाराष्ट्रात सक्रिय झाला आहे. तरीही पुढील महिनाभरपर्यंत राज्यात मान्सूनची हजेरी राहणार आहे. अंदाजे ऑक्टोबर मध्यापर्यंत परतीचा पाऊस संपूर्ण देशातून निघून जाईल आणि दक्षिणेकडील चार राज्यांमध्ये ईशान्य मान्सून म्हणून स्थिरावेल.
विशेष म्हणजे, येत्या रविवारपासून गुरुवार (दि. १८) पर्यंत महाराष्ट्रात जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ या भागात मुसळधार पाऊस कोसळणार आहे. येवला परिसरात सध्या जोरदार पावसाने परिस्थिती गंभीर बनली आहे.
यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते वाहतूक अडथळित होण्याची शक्यता असून पूरस्थिती उद्भवण्याची देखील शक्यता आहे. शेतकऱ्यांनीही पिकांची योग्य खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे हवामानतज्ज्ञांचे मत आहे.
नागरिकांनी सरकारी सूचना पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.



