या शहरातील जीवन वाहतूक कोंडी चे : की प्रशासनाच्या निष्क्रियतेचे द्योतक
वेगवान मराठी : मारुती जगधने
[ 11 सप्टेंबर 2025 ]मनमाड (ता . नांदगांव) शहरातून जाणाऱ्या इंदोर–पुणे राष्ट्रीय महामार्गावर दररोजची कोंडी आता शहरवासीयांच्या नशिबी आली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या या रस्त्यालगत मोठ्या प्रमाणावर झालेले अतिक्रमण, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना लावलेली लहान-मोठी वाहने, तसेच वाहतुकीचा अनियंत्रित प्रवाह यामुळे नागरिकांचे जगणे अक्षरशः त्रासदायक झाले आहे.
एक किलोमीटरपर्यंत रस्त्यावर तासन्तास वाहतूक ठप्प राहणे ही नित्याची बाब झाली आहे. प्रवाशांना वेळेवर गंतव्यस्थानी पोहोचणे कठीण तर झालेच आहे, पण शहरात प्रदूषणाचे प्रमाणही झपाट्याने वाढले आहे. धुरकट वातावरण, हॉर्नांचा आवाज आणि धुळीमुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. व्यापारी वर्गापासून विद्यार्थ्यांपर्यंत आणि रुग्णवाहिकेत प्रवास करणाऱ्या रुग्णांपर्यंत सर्वांनाच या कोंडीचा फटका बसतो आहे.
यातील मूळ कारण म्हणजे रस्त्यालगतचे अतिक्रमण. अनेक वर्षे नागरिकांनी केलेल्या तक्रारींनंतरही नगरपरिषद, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पोलीस प्रशासन यांनी ठोस कारवाई केलेली नाही. राजकीय हस्तक्षेप आणि प्रशासनाची ढिलाई यामुळे अतिक्रमणकर्त्यांचे मनोबल वाढले आहे ?
मनमाडसारख्या रेल्वे व औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाच्या शहरात वाहतूक कोंडी ही गंभीर समस्या आहे. आज ती “त्रासदायक” पातळीवर पोहोचली आहे. येणाऱ्या काळात शहराची लोकसंख्या व वाहनसंख्या वाढत जाईल, तेव्हा ही समस्या आणखीनच बिकट होणार आहे.
प्रशासनाने तातडीने अतिक्रमण हटवून, वाहतूक नियंत्रणासाठी पर्यायी उपाययोजना राबवून आणि नागरिकांच्या सहभागातून शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्था उभी केली पाहिजे. अन्यथा मनमाडकरांचे जीवन “कोंडीतले जीवन” ठरणार हे निश्चित. न
ही समस्या फक्त वाहतुकीची नाही, तर प्रशासनाच्या निष्क्रियतेचे द्योतक आहे.



