
जन सुरक्षा कायदा त्वरीत रद्द करा मागणी
वेगवान मराठी : मारुती जगधने
नांदगाव : दि . [ 10 सप्टेंबर 20257
जनतेच्या लोकशाही हक्कांवर गदा आणणारा व नागरिकांवर अन्याय करणारा जनसुरक्षा कायदा त्वरित रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) तर्फे राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे.
नांदगाव तालुक्यातील पदाधिकारी व शिवसैनिकांनी तहसीलदार कार्यालयात निवेदन सादर करून हा कायदा रद्द करण्याची मागणी केली.
निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील भाजप सरकारने पाशवी बहुमताचा वापर करून जनसुरक्षा कायदा मंजूर केला. या कायद्यामुळे लोकशाही मूल्यांची पायमल्ली होणार असून नागरिकांचे तसेच विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांचे स्वातंत्र्य धोक्यात येईल. शासनाला कोणत्याही व्यक्तीस अटक करून जेलमध्ये डांबण्याचा अधिकार मिळाल्याने लोकांवर अन्याय व अत्याचार होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
सरकार या कायद्याचा गैरवापर करून विरोधकांवर कारवाई करेल, अशी भीती व्यक्त करत निवेदनात हा कायदा तात्काळ रद्द करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर नांदगाव तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे पदाधिकारी व शिवसैनिकांची सही करण्यात आली.



