या देशाने कांदा आयातीवरील शुल्क वाढवले ; कांदा उत्पादक व निर्यातदार यांना फटका बसणार..?

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे
शिरवाडे वाकद, दि. २६ ऑगस्ट २०२५ :
श्रीलंकेने कांद्याच्या आयातीवर असलेले शुल्क मोठ्या प्रमाणात वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे भारतीय कांद्याचे दर श्रीलंकेत तब्बल पाचपट वाढणार असून याचा थेट फटका भारतीय निर्यातदार व श्रीलंकन ग्राहकांना बसणार आहे.
भारतातून १० रुपये प्रति किलो या दराने निर्यात होणारा कांदा आता श्रीलंकेच्या बाजारपेठेत ५० रुपये प्रति किलो या दराने विकला जाणार आहे. शुल्कवाढीमुळे भारतातून जाणाऱ्या कांद्याच्या पुरवठ्यावर मर्यादा येण्याची शक्यता असून तेथे आयात प्रमाणात घट होण्याचा अंदाज आहे.
काही दिवसांपूर्वीच श्रीलंकेने कांदा आयातीवरील बंदी हटवून आयात सुरू केली होती. त्यामुळे नाशिकसह महाराष्ट्रातील शेतकरी आणि निर्यातदार यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. परंतु आता वाढलेल्या शुल्कामुळे श्रीलंकेतील बाजारपेठेत भारतीय कांद्याची मागणी घटण्याची शक्यता आहे.
शुल्कवाढीमागील हेतू हा स्थानिक शेतकऱ्यांच्या उत्पादनाला संरक्षण देणे आणि देशांतर्गत कांदा उत्पादनाला चालना देणे असा असल्याचे श्रीलंका सरकारकडून सांगण्यात आले आहे. स्थानिक शेतकऱ्यांना बाजारभाव टिकून राहावा, तसेच स्वदेशी उत्पादनाला प्रोत्साहन मिळावे यासाठी हा निर्णय घेतल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, नाशिकसह महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात परदेशात निर्यात होते. श्रीलंका ही भारताची एक महत्त्वाची कांदा आयात करणारी बाजारपेठ मानली जाते. त्यामुळे या शुल्कवाढीमुळे नाशिक, लासलगाव, येवला परिसरातील निर्यातदारांवरही परिणाम होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
श्रीलंकेतील शुल्कवाढ हा भारतीय कांदा निर्यातदारांसाठी एक मोठा धक्का आहे. आगामी काही दिवसांत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कांद्याचे दर व निर्यात प्रवाह कसा राहील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
केंद्र सरकार व कांदा निर्यात हे धोरण वारंवार शेतकऱ्यांच्या मुळावर उठत आहे. जगातील कांदा आयातीत देश वारंवार कांद्यावरील आयात शुल्क वाढवतात त्यामुळे कांदा दराला फटका बसतो, त्यामुळे केंद्र सरकारने कांदा निर्यातीसंदर्भात कायमस्वरूपी धोरण अवलंबवावे.
डॉ.श्रीकांत आवारे
संचालक, लासलगाव कृ.ऊ.बाजार समिती



