जिल्हा परिषद शाळा लय भारी; गुणवत्ता पुन्हा सिद्ध! अंदरसुलच्या श्रावणीचा जिल्हाभरात डंका, विमानातून दिल्ली सहलीची संधी”
जिल्हा परिषद शाळा लय भारी; गुणवत्ता पुन्हा सिद्ध! अंदरसुलच्या श्रावणीचा जिल्हाभरात डंका, विमानातून दिल्ली सहलीची संधी”

वेगवान प्रतिनिधी :एकनाथ भालेराव
येवला :दिनांक :16मार्च /ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला नवे पंख देणारी अभिमानास्पद घटना अंदरसुल गावातून समोर आली आहे. जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा अंदरसुल मुली शाळेची विद्यार्थिनी कु. श्रावणी मच्छिंद्र शिनगारे हिने स्पेलिंग बी स्पर्धेत जिल्हाभरातून प्रथम क्रमांक मिळवत ‘ज्ञानयात्री’ उपक्रमांतर्गत दिल्ली अभ्यास दौऱ्यासाठी निवड मिळवली आहे. त्यामुळे अंदरसुल गावासह येवला तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ओमकार पवार यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देशाची राजधानी आणि राष्ट्रीय संस्थांची प्रत्यक्ष ओळख व्हावी या उद्देशाने दि.१६ मार्च ते १८ मार्च या कालावधीत दिल्ली येथे विशेष शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली आहे.
या उपक्रमातील विशेष बाब म्हणजे विद्यार्थ्यांच्या जाण्या-येण्याची व्यवस्था विमानाने करण्यात आली असून तीन दिवसांच्या सहलीचा संपूर्ण खर्च जिल्हा परिषद नाशिक उचलणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धांमध्ये स्पेलिंग बी आणि मॅथ बी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हाभरातील निवडक १८ विद्यार्थ्यांना या सहलीची संधी मिळाली आहे.
या अभ्यास दौऱ्यात विद्यार्थ्यांना राष्ट्रपती भवन, संसद भवनातील चालू अधिवेशन, राजघाट, शांतीवन, किसान घाट, अटल समाधी स्थळ, नॅशनल वॉर मेमोरियल, इंडिया गेट, लाल किल्ला, अक्षरधाम मंदिर तसेच विविध संग्रहालये आणि स्पोर्ट्स अॅक्टिव्हिटी पार्क यांसारख्या ऐतिहासिक व प्रेरणादायी स्थळांना भेट देण्याची संधी मिळणार आहे.
कु. श्रावणी शिनगारेच्या या यशामागे बाबासाहेब बेरगळ, विलास जानराव, मनोरमा सोनवणे, किशोरी नाकोड, जयश्री पालवे, गोकुळदास गलांडे, रामेश्वरी क्षीरसागर, मनीषा बांगर, प्रदीप अहिरे, पंडित गरुड व संदीप कांडेकर या शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
शाळेच्या या अभिमानास्पद यशाबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ओमकार पवार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्रीमती साईलता सामलेटी, गटविकास अधिकारी श्री. संदीप वायाळ, गटशिक्षणाधिकारी श्री. संजय कुसाळकर, विस्तार अधिकारी शिक्षण श्रीमती मनीषा वाकचौरे व श्रीमती नंदा ठोके, केंद्रप्रमुख श्री. नारायण डोखे, तसेच अंदरसुल ग्रामपंचायत सरपंच-उपसरपंच, सदस्य, शालेय व्यवस्थापन समिती, पालक व ग्रामस्थांनी श्रावणीचे अभिनंदन केले आहे.
ग्रामीण मातीतून उगवलेली ही यशाची कळी आता दिल्लीच्या दिशेने झेपावत असून अंदरसुल गावाचा शैक्षणिक मान अभिमानाने उंचावला आहे.



