ग्रामसभा ही गावकऱ्यांची सर्वोच्च संस्था खरोखरच मानली जाते का? की ग्रामपंचायत आपल्या सोयीसाठी ठरावांकडे दुर्लक्ष करून फक्त स्वहित साधते?
Nandgaon News
ग्रामसभा ही गावकऱ्यांची सर्वोच्च संस्था खरोखरच मानली जाते का? की ग्रामपंचायत आपल्या सोयीसाठी ठरावांकडे दुर्लक्ष करून फक्त स्वहित साधते?
वेगवान मराठीः मारुती जगधने
दिः [ 10 सप्टेंबर 2025 ]
गावाच्या कारभारासाठी घेतलेले निर्णय हे ग्रामसभेतून होतात, आणि ग्रामसभा ही लोकशाहीतील सर्वात महत्वाची संस्था आहे. 26 जानेवारी 2024 रोजी बोलठाण ग्रामसभेत ग्रामपंचायत खाली बांधावी व आजूबाजूला कुठलेही गाळे बांधू नयेत, असा स्पष्ट ठराव पारित झाला. मात्र या ठरावाला दुजोरा न देता ग्रामपंचायत प्रशासनाने खालच्या मजल्यावर व्यापारी गाळे व वरच्या मजल्यावर ग्रामपंचायत असे बांधकाम सुरू केले आहे.
या निर्णयाविरोधात मनोज रिंढे यांनी आमरण उपोषण सुरू केले असून, त्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तसेच प्रहार दिव्यांग संघटना बोलठाण यांचा पाठिंबा मिळाला आहे. गावाची लोकसंख्या दहा हजारांपेक्षा जास्त असताना, नागरिकांना सुविधा व्हाव्यात म्हणून ग्रामपंचायत कार्यालय खालच्या मजल्यावर असणे आवश्यक आहे, ही त्यांची मागणी आहे.
परंतु सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांचे म्हणणे असे की, या कामाला ग्रामसभेपूर्वीच मंजुरी मिळालेली आहे व कार्यारंभ आदेशही दिलेला आहे. त्यामुळे हे काम थांबवणे शक्य नाही. आता प्रश्न असा उभा राहतो की, मग ग्रामसभेत ठराव घेण्याचा उपयोग काय? ग्रामसभा फक्त औपचारिकतेपुरती आहे का?
गावकऱ्यांत दबक्या आवाजात चर्चाही सुरू आहे की ग्रामपंचायत खालच्या मजल्यावर असणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे उपोषणकर्ते मनोज रिंढे यांच्या पत्नी सध्याच्या ग्रामपंचायत सदस्या आहेत, त्यामुळे या संघर्षाला आणखी वेगळं राजकीय व सामाजिक परिमाण मिळालं आहे.
संपूर्ण प्रकरणातून एकच प्रश्न स्पष्टपणे समोर येतो —
ग्रामसभा ही गावकऱ्यांची सर्वोच्च संस्था खरोखरच मानली जाते का? की ग्रामपंचायत आपल्या सोयीसाठी ठरावांकडे दुर्लक्ष करून फक्त स्वहित साधते?
जर ग्रामसभेतील ठरावांवरच कृती होत नसेल, तर लोकशाहीतील ही मूलभूत व्यासपीठ केवळ औपचारिक राहते. आणि अशा वेळी गावकऱ्यांचा विश्वास डळमळतो, तसेच गावाचा कारभार स्वार्थासाठी चालतोय का, अशी शंका निर्माण होते.



