देवळा : सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कामांची बिले शासनाकडून निधी न मिळाल्यामुळे रखडली आहेत. यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या कंत्राटदारांनी देवळा येथे बैठक घेऊन शासनाबद्दल आपली नाराजी व्यक्त केली. या बैठकीत शासनाकडे प्रलंबित असलेली बिले, त्यामुळे निर्माण झालेल्या समस्या आणि पुढील कार्यवाहीबाबत चर्चा करण्यात आली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी रमेश सिरसाठ होते, तर व्यासपीठावर बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, मालेगाव सेंटरचे अध्यक्ष संदीप भुसे, महेंद्र पाटील, रवी आहिरे, हेमंत पाटील, धिरेन पगार आदी मान्यवर उपस्थित होते. शासनाकडे बिले थकल्यामुळे आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे सांगली येथील हर्षल पाटील या कंत्राटदाराने आत्महत्या केली. या घटनेची दखल घेत बैठकीच्या सुरुवातीला त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
- कोट्यवधींची बिले थकल्याने ठेकेदार आर्थिक संकटात
यावेळी मालेगाव सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत सुमारे १००० कोटी रुपयांची, तर कळवण विभागातील सुमारे ४०० कोटी रुपयांची बिले प्रलंबित असल्याचा मुद्दा समोर आला. निधीअभावी अनेक विकासकामे अपूर्ण अवस्थेत आहेत, ज्यामुळे गणेश चतुर्थीपूर्वी रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे कामही पूर्ण होऊ शकले नाही.
- बैठकीत प्रलंबित बिलांबाबत संबंधित
विभागांशी पत्रव्यवहार करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, लोकप्रतिनिधींची भेट घेऊन कंत्राटदारांच्या समस्या त्यांच्यासमोर मांडण्याचा ठराव संमत करण्यात आला.
या बैठकीला समाधान आहिरराव, विजय गुंजाळ, गौरव पाटील, शुभम चंदन, सचिन आहेर, विलास सुर्यवंशी, संजय वाघ, रोहित पगार, अजय पगार, वैभव पाटील, हेमंत पाळेकर, विशाल वाघ, निलेश वाघ, दीपक खैरणार, प्रशांत मेतकर यांच्यासह कसमादे भागातील अनेक कंत्राटदार उपस्थित होते. थकित बिलांच्या समस्येमुळे कंत्राटदार मोठ्या आर्थिक संकटात सापडले असून, यावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी त्यांनी केली आहे.