कौतिकपाडे औंदाणे नागरीकांचा कर्जमाफीसाठी मतदानावर बहिष्कार, शेतकऱ्यांच्या विविध मागण्या; भावना तीव्र

वेगवान नासिक / तुषार रौंदळ
विरगाव दि. 11 ऑगस्ट 2025 :-
केंद्र व राज्य शासन कर्जमाफीसह अन्य मागण्यांसंदर्भात प्रत्यक्षात कार्यवाही करीत नाही, तोपर्यंत आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय तालुक्यातील औंदाणे, कौतिकपाडे, सुकड नाला परिसरातील ग्रामस्थांनी घेतला.
कर्जमाफीचे आश्वासन दिल्यानंतरही त्याची पूर्तता झालेली नाही. शेतकऱ्यांना २४ तास अखंड वीजपुरवठा मागणी वास्तवात आलेली नाही. शेतकरी आत्महत्या प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना तीव्र झालेल्या आहेत.
शासन स्तरावरील वेगवेगळे अनुदान, पीकविमा नियमित मिळत नाही. यासंदर्भात विचार विनिमयासाठी औंदाणेत झालेल्या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी प्रहारचे जिल्हा सरचिटणीस तुषार खैरनार, माजी सभापती चिला निकम, विलास देवसन निकम, विलास महादू निकम, मनोहर निकम, अनिल देवरे, प्रवीण निकम आदींसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते



