कडाक्याच्या उन्हात लगीनघाई; भविष्यात उन्हाळ्यातील विवाह सोहळे थांबणार?गोरज मुहूर्तांना पसंती .
Nandgaon news
कडाक्याच्या उन्हात लगीनघाई; भविष्यात उन्हाळ्यातील विवाह सोहळे थांबणार?गोरज मुहूर्तांना पसंती .
वेगवान मराठी : मारुती जगधने
दिनांक 13 मे 2016
सन २० २७ मध्ये राज्यासह उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये तापमानाने तब्बल ४० ते ४६ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला होता. अंगाची अक्षरशः लाहीलाही करणारे ऊन, उष्णतेच्या लाटा आणि त्यात सुरू असलेली लगीनघाई… ही परिस्थिती आजही नागरिकांच्या स्मरणात कायम आहे. सकाळी आठ वाजल्यापासूनच उन्हाचे चटके जाणवू लागतात आणि दुपारपर्यंत रस्ते अक्षरशः तापून निघतात. अशा वेळी लग्नसमारंभासाठी धावपळ करणाऱ्या वऱ्हाडी मंडळींची अवस्था अत्यंत बिकट होत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे.
लग्न म्हटले की आनंद, नातेवाईकांची गर्दी, सत्कार, मानपान, नवरा-नवरीचे नटणे, वऱ्हाड्यांची लगबग आणि एका वेळेत अनेक विवाह उरकण्याची घाई… पण या सर्व उत्साहावर आता वाढत्या तापमानाचे सावट गडद होताना दिसत आहे. अनेक लग्नसमारंभांमध्ये मंडपाबाहेर उभे राहणेही कठीण होत असून, टॉवेल, टोपी, थंड पाण्याच्या बाटल्या आणि सावली शोधत फिरणारे पाहुणे हे आता सामान्य दृश्य बनले आहे.
उन्हाच्या झळा केवळ माणसांनाच नव्हे तर लहान मुले, वृद्ध, महिला, जनावरे, पाळीव प्राणी तसेच वन्यजीवांनाही सहन कराव्या लागत आहेत. उष्णतेमुळे चक्कर येणे, निर्जलीकरण, रक्तदाब वाढणे, उष्माघात यांसारख्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेमुळे बळी गेल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेषतः ग्रामीण भागात लग्नासाठी दुपारच्या वेळेत मोठी गर्दी होत असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनते. गावागावांतून येणाऱ्या वऱ्हाड्यांना उन्हात प्रवास करावा लागतो. अनेक ठिकाणी मंडपांमध्ये पुरेशी हवा किंवा थंडाव्याची व्यवस्था नसल्याने लहान मुलांचा आणि वृद्धांचा मोठ्या प्रमाणावर कोंडमारा होत आहे. “जीव मुठीत धरून लग्नाला जावे लागते,” अशी प्रतिक्रिया अनेक नागरिक व्यक्त करत आहेत.
दरम्यान, हवामानातील बदल आणि सातत्याने वाढणारे तापमान लक्षात घेता भविष्यात उन्हाळ्यातील विवाह सोहळ्यांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. २०२७ आणि पुढील काळात एप्रिल-मे महिन्यातील लग्न समारंभ टाळून नागरिक हिवाळा किंवा थंड हवामानातील दिवसांना किंवा गोरज मुहूर्तावर लागणारी विवाह सोहळे यांना पसंती देतील, असा सूर आता विविध भागांतून उमटू लागला आहे.
समाजातील ज्येष्ठ नागरिक, आरोग्य तज्ज्ञ आणि काही विवाह आयोजक देखील आता बदलत्या हवामानानुसार विवाह पद्धतीत बदल आवश्यक असल्याचे सांगत आहेत. सकाळच्या किंवा रात्रीच्या वेळेत लग्न समारंभ आयोजित करणे, वातानुकूलित सभागृहांचा वापर, पाण्याची आणि आरोग्य सुविधांची उपलब्धता यावर भर दिला जात आहे.
एकेकाळी उत्साहाचे प्रतीक असलेली लगीनघाई आता वाढत्या उष्णतेमुळे चिंतेचा विषय बनू लागली आहे. भविष्यात उन्हाळ्यातील विवाह सोहळ्यांपेक्षा हिवाळ्यातील लग्नांना अधिक पसंती मिळेल का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
डीजेच्या तालावर थिरकणारी वरात; बदलत्या विवाहसोहळ्यांचा रंगतदार चेहरा
गाव असो किंवा शहर… लग्न म्हटले की आता पारंपरिक ढोल-ताशांसोबत कानठळ्या बसवणारा डीजे, रंगीबेरंगी लाईट्स, धुराचे फवारे आणि धुमधडाक्यात नाचणारी तरुणाई हे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. विवाहसोहळ्यांमध्ये आता केवळ विधींनाच नव्हे, तर वरातीतील जल्लोषालाही तितकेच महत्त्व प्राप्त झाले आहे.
सध्या विवाह हंगाम सुरू होताच रस्त्यावरून जाणाऱ्या भव्य वराती नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. “झिंगाट”, “मल्हारी”, “नटरंग”, “सैराट” यांसारख्या गाण्यांच्या तालावर थिरकणारी मराठी मंडळी, डोक्यावर फेटे, खांद्यावर तुरे-शाल, हातात गुलाल आणि चेहऱ्यावर आनंदाचे भाव… अशा वातावरणात संपूर्ण परिसर उत्साहाने भारून जातो.
वरातीमध्ये विशेष आकर्षण ठरतात ती वधू-वरांना खांद्यावर घेऊन नाचणारी उत्साही मंडळी. डीजेच्या जोरदार बीट्सवर मित्रपरिवार आणि नातेवाईक नवदांपत्याला खांद्यावर उचलून जल्लोष करतात. काही ठिकाणी तर वरातीत युवकांचे वेगवेगळे डान्स स्टेप्स, फॉग मशीन, लेझर लाईट्स आणि बँडसोबतचा तालबद्ध नाच पाहण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करतात.
वऱ्हाडी मंडळींची धावपळ आणि मानपानाची परंपरा देखील विवाहसोहळ्याचा महत्त्वाचा भाग ठरत आहे. आगंतुकांचे स्वागत करताना तुरे, शाल, फेटे देण्याची पद्धत अनेक भागांत अजूनही जपली जात आहे. गावागावांतून आलेली नातेवाईक मंडळी या जल्लोषात मनमुराद सहभागी होताना दिसतात.
मात्र या वाढत्या डीजे संस्कृतीबाबत काही सामाजिक प्रश्नही उपस्थित होत आहेत. अत्यंत मोठ्या आवाजातील संगीतामुळे वृद्ध, लहान मुले आणि रुग्णांना त्रास सहन करावा लागतो. काही वेळा डीजेच्या तालावर बेभान होऊन नाचताना अपघात किंवा वादाच्या घटनाही घडतात. तसेच उष्णतेच्या काळात तासन्तास चालणाऱ्या वरातींमुळे अनेकांना थकवा, चक्कर येणे किंवा आरोग्याच्या समस्या निर्माण होत असल्याचे डॉक्टर सांगतात.
पोलीस प्रशासनाकडूनही ध्वनीप्रदूषणाबाबत वेळोवेळी नियमावली जारी केली जाते. रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या डीजे पार्टींवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न होत असले तरी विवाहसोहळ्यातील उत्साहामुळे अनेकदा नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते.वेळेत साजरी होणाऱ्या विवाहांच्या बाबतीत आनंद आणि पसंती व्यक्त होते तर उशिराने लागणाऱ्या विवाह सोहळ्यांवरती नाराज व्यक्त होताना दिसते .
तरीदेखील, लग्नातील डीजे, नाच-गाणे आणि जल्लोष ही आजच्या पिढीची मोठी आकर्षणकेंद्रे बनली आहेत. पारंपरिक संस्कृतीसोबत आधुनिक धुमधडाक्याची जोड मिळाल्याने विवाहसोहळे अधिक रंगतदार होत असले तरी त्यात सुरक्षितता, संयम आणि सामाजिक भान राखणेही तितकेच महत्त्वाचे असल्याची भावना आता व्यक्त होऊ लागली आहे



