वेगवान मराठी : मारुती जगधने
दिनांक 12 मे 2026
नांदगाव :
नांदगाव-येवला तालुक्याच्या सीमेवरील अंकाई किल्ला परिसरातील अगस्तीच्या जंगलाला गेल्या तीन दिवसांपासून भीषण आग लागली असून, संपूर्ण डोंगररांगांमध्ये वणवा मोठ्या प्रमाणावर पसरला आहे. वाढते तापमान, कोरडे वातावरण आणि वेगवान वाऱ्यामुळे ही आग अधिक धोकादायक बनत चालली आहे.
रात्रीच्या वेळी डोंगररांगांवर पेटलेल्या आगीच्या ज्वाळा लांबून स्पष्टपणे दिसत असून, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आगीमुळे जंगलातील झाडे, औषधी वनस्पती तसेच वन्यजीवांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या तीन दिवसांपासून आग धुमसत असतानाही ती पूर्णपणे विझवण्यासाठी प्रभावी उपाययोजना होताना दिसत नाहीत. त्यामुळे वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, “वनविभाग नेमके काय करीत आहे?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
परिस्थिती गंभीर
तीन दिवसांपासून डोंगररांगांमध्ये आग कायम
वाऱ्यामुळे आगीचा वेग वाढत आहे
वन्यजीव आणि दुर्मिळ वनस्पती धोक्यात
रात्रीच्या वेळी ज्वाळा स्पष्टपणे दिसत आहेत
नागरिकांकडून तातडीच्या कारवाईची मागणी
स्थानिक नागरिकांनी वनविभाग आणि प्रशासनाने तातडीने घटनास्थळी यंत्रणा पाठवून आगीवर नियंत्रण मिळवावे, अशी मागणी केली आहे. अन्यथा संपूर्ण डोंगर परिसर खाक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.



