या शहरातील अतिक्रमण काढा अन्यथा भ्रष्टाचार निर्मूलन समिती करणार आत्मदहन
या शहरातील अतिक्रमण काढा अन्यथा भ्रष्टाचार निर्मूलन समिती करणार आत्मदहन

वेगवान मराठी /एकनाथ भालेराव
येवला :- (दि. 08 ऑक्टोबर )येवले शहर व महामार्गालगत असलेले अतिक्रमण काढून शहराचा श्वास मोकळा करावा अशी मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे येवला पालिकेकडे केली आहे. अन्यथा पालिकेसमोर आत्मदहन करू असे देखील निवेदनात म्हटले आहे. सद्या येवले शहर अतिक्रणाच्या विळख्यात सापडल्याने वाहतूकीची कोंडी होऊन अपघातांची संख्या वाढली आहे. परिणामी अनेक निष्पाप लोकांचा नाहक बळी गेल्याचे अनेक उदाहरणे आहेत.मनमाड नगर रोड, फत्तेबुरुज नाका ते उड्डान पूल, शीतला माता मंदिर ते नांदगाव सर्कल, आणि नांदगाव रोड सर्कल ते देवी खुंट रस्त्यावर दुकानदार, रहिवाशी यांनी मोठया प्रमाणावर अतिक्रमण केलेले आहे. पादचारी मार्गावर चक्क घरे, दुकाने, हॉटेल थाटली गेल्याने या रस्त्यावरून प्रवास करणे जोखमीचे झाले आहे. पादचारी, दुचाकी स्वार यांना जागा उरत नसल्याने मोठया वाहनाची देखील गोची होते. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगर पालिका टोलवा टोलवी करत असल्याने अशा अतिक्रमण धारकांना अतिक्रमणाची संधी मिळते.विंचूर चौफुलीवर एका मुलीला जीव गमवावा लागला. त्यानंतर सातत्याने झालेल्या अपघातात येवल्यातील तीन जण अपघातात ठार झाले. ही अपघाताची मालिका थांवण्यासाठी पालिका प्रशासनाने त्वरित अतिक्रमण मोहीम राबवून शहराचा श्वास मोकळा करावा अशी मागणी करत आत्मदहणाचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर सुनील जाधव, दिपक खोडके, निर्मला बुल्हे, कृष्णा शिंदे, बाबासाहेब बोंबले, बाजीराव देवके, शिवकुमार आनंद आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
सोबत फोटो पाठवला आहे



