महामंडळाची बस उत्राणे गावाजवळ पलटी, सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही,रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर

वेगवान नाशिक/तुषार रौंदळ
विरगांव दि.१६ ऑगस्ट २०२५:- शनिवार (दि.१६) रोजी सटाणा आगारातून सुटलेली एमएच ०७ सी,
९४३० क्रमांकाची महामंडळाची बस दुपारी ४ वाजेच्या सुमारास उत्राणे गावाजवळ अपघातग्रस्त झाली. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून, खराब रस्त्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असुन, परिसरातील रस्त्यांबाबत नागरिकांनी तीव्र असंतोष व नाराजी व्यक्त केली आहे.
हि बस मानव विकास योजनेअंतर्गत चालवली जात होती अशी माहिती पुढे आली आहे. शाळा व कॉलेज यांना सुट्टी असल्यामुळे बसमध्ये शालेय विद्यार्थी व प्रवासी संख्याही कमी होती.या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, तसेच सर्व प्रवासी सुखरूप असून, स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मागील दरवाजातून त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
अपघाताचे कारण ठरले आहे उत्राणे ते टींगरी मार्गावरील अतिशय खराब, अर्धवट रस्ता पावसाळ्यामुळे मातीचा भराव ओलसर आणि चिखलयुक्त झाला आहे. अशा स्थितीत समोरून येणाऱ्या वाहनाला वाचवण्यासाठी बस चालकाने बस रस्त्याच्या कडेला घेतली असता, बसचे एक चाक मातीमध्ये खोलवर फसले आणि त्याच बाजूने बसचा तोल जाऊन जागीच पलटी झाली.
बागलाण तालुक्यातील अनेक रस्त्यांची अवस्था सध्या अत्यंत बिकट बनली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे अर्धवट अवस्थेत असून, ठेकेदारांनी मात्र केवळ बिले काढण्यासाठी माती टाकून काम पूर्ण झाल्याचा देखावा केला आहे. काही ठिकाणी तर कामे सुरूच झालेली नाहीत. परिणामी, दिवसेंदिवस वाहन अपघाताचे प्रमाण वाढत आहे. अपघाताची माहिती मिळताच परिसरात मोठी गर्दी झाली. नामपूर बस स्थानकाचे वाहतूक नियंत्रक मनीष शिंदे यांनी सांगितले की, “चालक व वाहक यांनी वेळेवर सतर्कता दाखवली नसती तर मोठा अनर्थ घडला असता.”
सदर रस्त्याचे काम करणाऱ्या यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सामाजिक कार्यकर्ते हेमंत ठाकरे, मनोहर पाटील, गणेश गायकवाड, बी. एस. भामरे, डॉ. सीताराम सोनवणे व अनिल पवार यांनी या घटनेनंतर संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सध्या घटनास्थळी पंचनामा सुरू असून, वरिष्ठ कार्यालयाकडे संपूर्ण अहवाल पाठवण्यात आला आहे.



