नाशिक जिल्ह्यातील या तालुक्यासाठी अजून पाणी उपलब्ध होणार
नाशिक जिल्ह्यातील या तालुक्यासाठी अजून पाणी उपलब्ध होणार

वेगवान मराठी /एकनाथ भालेराव
येवला :गुरुवार, दि. ०७ ऑगस्ट:- मांजरपाडा प्रकल्पाच्या माध्यमातून पाणी दरसवाडी धरणात प्रवाही झालेले असून हे पाणी दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालव्याच्या माध्यमातून डोंगरगावकडे सोडण्यात आले आहे. या माध्यमातून येवला, चांदवड, दिंडोरी तालुक्यातील सर्व बंधारे भरण्यात येणार आहे. आपण केवळ यावरच थांबणार नाही. तर पार गोदावरी प्रकल्पाच्या माध्यमातून अधिक १०.५० टीएमसी पाणी उपलब्ध होणार आहे. यातून नाशिकसह मराठवाड्याला पाणी उपलब्ध होईल असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, मांजरपाडा हा पथदर्शी प्रकल्प साकारण्यात आलेला आहे. या प्रकल्पाचे पाणी येवल्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहचविण्यासाठी २६३ कोटी रुपये खर्च करून कालव्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. या प्रकल्पाच्या अधिकच्या पाण्यासाठी पार गोदावरी प्रकल्प राबविण्यात येत आहे. याचा डीपीआर तयार करण्यात येत आहे. वर्षभरात हे काम पूर्ण होऊन कामाला सुरुवात होईल. यामाध्यमातून १० टीएमसी पाणी उपलब्ध होणार आहे. हे पाणी या कालव्याच्या माध्यमातून नाशिकसह मराठवाड्याला पोहचविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.



