शेतकरी कर्जमाफीच्या आशेवर, बँकांच्या मात्र वसुलीसाठी नोटिसा

वेगवान नाशिक / अरुण थोरे
नाशिक, ता. 16 – ऑगस्ट 2025 – महायुती सरकारने निवडणूक काळात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू अशी आपल्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात घोषणा केली होती, मात्र सरकार स्थापन होऊन वर्ष होत आलं तरी अजून घोषणा हवेतच विरली असून,सरकारने नुकतीच कर्जमाफीसाठी समिती स्थापन केली असून, कर्जमाफीची कधी घोषणा कधी होणार, हे मात्र अनिश्चित आहे.
कर्जमाफीच्या आशेवर शेतकऱ्यांनी कर्ज थकविले असल्याने बँकांनी आता वसुलीसाठी नोटिसा पाठविण्याचे सुरू केले असून, राज्यातील १९ जिल्ह्यातील सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांना नोटीसा पाठवल्या जात आहे.
एका बँकर्स समितीच्या अहवालानुसार २१ लाख शेतकऱ्यांकडे ३२ हजार कोटी रुपयांची थकबाकी असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान महायुती सरकारकडून समिती गठित केल्यानंतर गरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वक्तव्य केले आहे. एकीकडे सरकार कर्जमाफीच्या घोषणेसाठी विलंब करत असताना बँकांनी मात्र शेतकऱ्यांना नोटीसीच्या माध्यमातून तगादे सुरू केले असुन, तर काही थकबाकीदार शेतकऱ्यांना कोर्टाचे हेलपाटेही मारावे लागत आहे त्यामुळे राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांचे संपूर्ण लक्ष कर्जमाफीच्या घोषणेकडे लागले आहे.
आधीच शेतकरी दुष्काळ, अतिवृष्टी या समस्यांमुळे त्रस्त असताना आणि शेतीमालाला भाव मिळत नसल्याने राज्यातील शेतकरी अधिकच आर्थिक संकटात सापडला आहे.



