मूळच्या देवळा तालुक्यातील दाम्पत्याची रेल्वे खाली उडी मारून आत्महत्या; सर्वत्र हळहळ

मनोज वैद्य/ दहिवड
७ ऑगस्ट २०२५
मूळचे देवळा तालुक्यातील रहिवासी असलेल्या व जिल्ह्यातील महत्वाची बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या घोटी शहरातील सुधानगर येथील दाम्पत्याने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. काल बुधवार दि.६ ऑगस्ट रोजी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास ही घटना घडली असून, या दोघांनी आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी सायंकाळी नाशिकहुन इगतपुरीकडे जाणाऱ्या रेल्वे रूळावर धावत्या रेल्वेखाली दिनेश देविदास सावंत (वय ३८) आणि विशाखा दिनेश सावंत (वय ३३) यांनी उडी घेऊन आपले आयुष्य संपवले. मयत दिनेश सावंत यांचा परिवार मूळचा देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथील रहिवासी असून वडील हे नोकरीनिमित्त घोटी येथे स्थायिक झाल्याने त्यांचे तेथे वास्तव्य होते.
सदर घटनेची माहिती देविदास देवाजी सावंत यांनी घोटी पोलिसांना दिली.
दरम्यान, त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत घोटी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक करीत आहे. या घटनेमुळे डोंगरगाव सह देवळा व घोटी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.



