नागपूरमध्ये बुधवारी १६ एप्रिल रोजी काँग्रेसचा ‘सद्भावना शांती मार्च’
प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्त्वाखाली सद्भावना शांतीमार्च

मुंबई, दि. १५ एप्रिल २०२५
राज्यात काही शक्ती जाणीवपूर्वक जातीधर्माच्या नावाखाली अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. नागपूरमध्ये मागील महिन्यात धार्मिक हिंसाचार उफाळला होता त्यामागे याच शक्ती होत्या. राज्यात शांतता नांदावी ही काँग्रेसची भूमिका असून सामाजिक सद्भाव वाढीस लागला पाहिजे, याच हेतूने प्रदेश काँग्रेसने प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली उद्या बुधवार दिनांक १६ एप्रिल रोजी नागपूरमध्ये सद्भावना शांती मार्च आयोजित केला आहे.
या सद्भावना शांती मार्च मध्ये प्रभारी रमेश चेन्नीथला, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी कुणाल चौधरी यांच्यासह पक्षाचे जेष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. शांती मार्च हा सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक, गांधी गेट महाल येथून सुरु होत असून कोतवाली पोलीस स्टेशन, बडकस चौक, चिटणीस पार्क, देवडीया भवन, भालवारपुरा चौक, गंजपेठ येथून राजवाडा पॅलेस येथे समारोप होईल.
नागपूर हिंसाचारानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने जेष्ठ नेते माणिकराव ठाकरे व इतर नेत्यांची एक समिती गठीत करून नागपुरातील घटनास्थळाला भेट देण्याचा प्रयत्न केला पण स्थानिक पोलिसांनी काँग्रेसच्या समितीला परवानगी दिली नाही. काँग्रेस समितीने नागपुरमधील विविध संस्था व नागरिक यांच्याशी चर्चा करुन संपूर्ण घटनेची माहिती घेतली व महामहिम राज्यपाल यांची मुंबईत राजभवन येथे भेट घेऊन या घटनेसंदर्भात एक निवेदनही सादर केले आहे. राज्यात सामाजिक सौहार्द व शांतता नांदावी यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने हा सद्भावना शांती मार्च आयोजित केला आहे.
