गुणवत्तापूर्ण कामासाठी अंनिस कार्यकर्त्यांना प्रशिक्षण
दोन दिवसीय राज्य कार्यकारिणी बैठकीच्या समारोप

वेगवान नाशिक/Wegwan Nashik:-
विशेष प्रतिनिधी,नाशिक-
अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम अधिक गुणवत्तापूर्ण होण्यासाठी प्रशिक्षणावर भर देणार – माधव बावगे
समाजातील अंधश्रद्धांचे निर्मूलन करणे व समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणे यासाठी महाराष्ट्र अंनिस मागील ३५ वर्षांपासून संघटितपणे कार्यरत आहे.अति संवेदनशील व जोखमीचे असलेले हे काम पुढील काळात अधिक गुणवत्तापूर्ण व मोठ्या प्रमाणात होण्यासाठी कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणावर भर देण्यात येईल , असे प्रतिपादन महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे यांनी केले.
नाशिक येथे नुकत्याच झालेल्या दोन दिवसीय राज्य कार्यकारिणी बैठकीच्या समारोपाच्या वेळी बावगे बोलत होते. ते पुढे म्हणाले की अंनिसच्या सततच्या प्रबोधनामुळे आणि जादूटोणाविरोधी कायद्याच्या धाकामुळे चमत्कार करणाऱ्या भोंदू बुवांची संख्या घटली . मात्र छद्मविज्ञान आणि देव, धर्म, अध्यात्माच्या नावाने भोंदूगिरी करणाऱ्या भोंदूंची संख्या वाढते आहे. त्यातून विशेष महिला, मुलींचे विविध प्रकारे मोठ्या प्रमाणात शोषण होत आहे. ते थांबवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सतत जागरूक राहून, सातत्याने संघटितपणे प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील ७० प्रमुख पदाधिकारी बैठकीत उपस्थित होते. आगामी तीन महिन्यांत जिल्हा व राज्य कार्यकारिणी निवड प्रक्रिया राबवणे, कार्यकर्ता व शिक्षक प्रशिक्षणं आयोजित करणे,आधुनिक अंधश्रद्धांची पोलखोल करण्यासाठी राज्य परिषदेचे आयोजन करणे, युवा व महिला सभासद नोंदणी अभियान राबविणे व त्यांचे प्रशिक्षण शिबीर आयोजित करणे, ग्रामीण व आदिवासी भागांमध्ये संघटनेचे काम वाढवणे आदी महत्वपूर्ण विषयांचा मागील चार महिन्यांच्या कामाचा आढावा, त्यावर सविस्तर चर्चा , मार्गदर्शन , निर्णय व पुढील नियोजन करण्यात आले.
कार्यकर्त्यांनी आपले आडनाव न लावता आपल्या नावापुढे आईचे आणि वडिलांचे नाव लावावे आणि कार्यकर्त्याच्या नावानेच कार्यकर्त्यांनी एकमेकाला आदराने संबोधावे, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
अंनिसचे प्रधान सचिव संजय बनसोडे, डॉ. ठकसेन गोराणे, नंदकिशोर तळाशीलकर, गजेंद्र सुरकार ,राज्य सरचिटणीस विनायक सावळे, रुक्साना मुल्ला , शहाजी भोसले आदींनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
बैठक यशस्वी करण्यासाठी नाशिक अंनिसचे राज्य पदाधिकारी कृष्णा चांदगुडे प्रा. डॉ. सुदेश घोडेराव, राजेंद्र फेगडे, प्रल्हाद मिस्त्री, जिल्हा पदाधिकारी डॉ. श्यामसुंदर झळके, नितीन बागुल, महेंद्र दातरंगे, एडवोकेट समीर शिंदे,अरुण घोडेराव, विजय खंडेराव, विजय बागुल, सुशील कुमार इंदवे आदींनी परिश्रम घेतले.
