शेतकऱ्यांनी पेरणी कधी करावी ? काय आहे हवामान तज्ज्ञांच मत !

वेगवान नाशिक / उत्तम गायकर
इगतपुरी : रेमन चक्रीवादळामुळे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात उष्णतेचे थैमान सुरू आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे राज्यात दिवसाचे तापमान वाढले आहे. मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांचा धीर सुटत चालला आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला मान्सूनची वाट पाहावी लागत आहे.
भारतीय हवामान खात्याने मान्सून ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज व्यक्त केला होता. परंतु बंगालच्या उपसागरात रेमन चक्रीवादळाची निर्मिती झाल्याने मान्सूनच्या प्रवासावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे मान्सूनचा आगमन थोडा लांबणीवर पडू शकतो.
जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी मान्सूनसंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. त्यांच्या मते, सध्या मान्सूनसाठी पोषक हवामान परिस्थिती आहे. २२ मेला मान्सूनचे अंदमानात आगमन झाले असून तेव्हापासून मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक परिस्थिती आहे.
पंजाबराव डख यांनी असा अंदाज व्यक्त केला आहे की, ३० ते ३१ मे दरम्यान मान्सून केरळमध्ये सक्रिय होईल. केरळमध्ये सक्रिय झाल्यानंतर महाराष्ट्रात एक, दोन आणि तीन जूनला चांगला मोठा पाऊस होईल. परंतु हा पाऊस मोसमी नसून पूर्वमोसमी पाऊस राहील.
पंजाबराव डख यांनी महाराष्ट्रात आठ जूनला मान्सून सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ झाल्याने मान्सूनची गती थोडी मंदावली आहे. तरीही यंदा आठ जूनपर्यंत महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल .असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
यावर्षी मान्सूनचा आगमन वेळेत झाल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि पेरणीच्या कामांना वेग येईल. परंतु पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. त्यांच्या मते, जोपर्यंत मान्सून पूर्णपणे सक्रिय होत नाही. तोपर्यंत शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची पेरणी करू नये.
निसर्गातील बदल आणि चक्रीवादळामुळे मान्सूनचा आगमन थोड उशिरा होण्याची शक्यता आहे. तरीही भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार आणि जेष्ठ हवामान तज्ज्ञांच्या मतानुसार, जूनच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्र आणि केरळमध्ये मान्सूनचे स्वागत होईल. शेतकऱ्यांनी थोडा धीर धरावा.आणि जोपर्यंत मान्सून पूर्णपणे सक्रिय होत नाही. तोपर्यंत पेरणीची प्रतीक्षा करावी. असे हवामान तज्ज्ञांचे मत आहे.
