वेगवान
नाशिक : नाशिक येथे आज पहाटे खासगी बसला झालेल्या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर ३४ जण जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
मृत्यूचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे. अपघातानंतर या बसने पेट घेतला आणि यात प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला असून मृत्यू झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना मदत जाहीर केली आहे.
बाजरीला आले 5 फुटांचे कणसं व्हिडीओ पाहून तुम्ही पण थक्क व्हाल पहा व्हिडीओ
“ही घटना खूप दुर्दैवी आहे, या घटनेचा तपास होईल” असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी जखमींना शासनातर्फे मोफत उपचार करण्यात येणार असल्याचं सांगितलं. तर मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. आज पहाटे पाच ते साडेपाचच्या दरम्यान हा अपघात घडला आहे.
“जखमींचा पूर्ण उपचार शासनाकडून केला जाईल आणि त्यांना कोणतीही कमी पडली जाणार नाही याची काळजी घेतली जाईल. त्याचबरोबर महापालिकेचे कर्मचारी तेथे असून त्यांनाही यासंदर्भात आदेश देण्यात आले आहेत” असं मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, आज पहाटे चिंतामणी ट्रॅव्हल्स या खासगी बसचा यवतमाळहून मुंबईकडे जात असताना नाशिक येथील नांदूर नाक्याजवळील मिरची हॉटेल येथे अपघात झाला. पहाटे पाच ते साडेपाचच्या दरम्यान हा अपघात घडला असून या बसचा कंटेनरशी झालेला अपघात एवढा भीषण होता की, अपघातानंतर बसने लगेच पेट घेतला.
बसमधील प्रवाशी झोपलेले असल्यामुळे प्रवाशांना बाहेर पडता आले नाही आणि त्यामुळे १० ते १२ जणांचा मृत्यू झाला आहे. घटना झाल्यानंतर पोलिस अधिकारी आणि अग्निशामक दलाचे जवान दाखल झाले होते. त्यानंतर जखमींंना बाहेर काढण्यात आले असून जखमी झालेल्या ३४ जणांना शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
“अपघातानंतर बसने पेट घेतला आणि काही प्रवासी बाहेर पडले, ४५ ते ४६ प्रवासी यामधून प्रवास करत होते. आम्ही दोन ते तीन प्रवाशांना वाचवले. पोलिस प्रशासनाला यायला जवळपास अर्धा तास लागला” असं स्थानिक नागरिकांनी सांगितलं.